Saturday, 1 January 2022

Happy New Year







ज्ञानेश्वरी अभ्यास चिंतन..

जेथोनि हें पार्था । विपरीत ज्ञान । विस्तारोनि स्वप्न | जागृतीत ॥९२९॥

क्षर पुरुष तो । खेळे रात्रंदिन । जगामाजीं स्वप्न । जागृतींनीं ॥९३३॥

त्या चि स्वप्न आणि । जागृति ह्या दोन । अवस्था जेथोन । उद्भवती ॥ ९३४ ॥

जयालागीं घन। अज्ञान-सुषुप्ति । ऐसें नांव देती । सुविख्यात ॥९३५॥

जयामाजीं एक । न राहतें न्यून । तरी तो चि पूर्ण । ब्रह्मलाभ ॥९३६॥

स्वप्न-जागृतीस । पुन्हा न तो घेता । तरी म्हणूं येता । ब्रह्मभाव ॥९३७॥

अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय  १५

माउली सांगतात.. की माणूस गाढ झोपेत असतो, तेव्हा जागेपणाचं ज्ञान त्याला नसतं, हे झालं अज्ञान.. तो जागा होतो तेव्हा 'आपण जागे झालो', ही जाणीव त्याला होते, हे झालं जाग आल्याचं ज्ञान..

पण नंतर ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मावळतं.. त्यामुळे दिवसभर जागे असतानाही ' मी जागा आहे ' ही जाणीव त्याला होत नाही..! अगदी त्याचप्रमाणे देहबुद्धीचं अज्ञान जाऊन आत्मज्ञान झालं की नंतर ज्ञान 'झाल्या'ची जाणीवही ओसरते आणि तो सदाजागृत अर्थात अखंड जाणिवेनुसार वावरू लागतो, हा स्वरूपी ब्रह्मभाव..!

मात्र यासाठी साधकाला आधी जागं करणारं जे साधन आहे ते ज्ञान आणि अज्ञान या दोहोंपेक्षा अलिप्त असलं पाहिजे.. करणारं साधन. ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे असणं आवश्यक आहे.. जे स्वतः जागृत आहे, तेच दुसऱ्याला जागवू शकते.. जो जागाच आहे, तोच झोपलेल्याला जागं करू शकतो..!

संत सांगतात, '' त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञान व अज्ञान या दोहोंपेक्षा तिसऱ्या कोणत्या तरी वस्तूची गरज लागते.. त्यालाच साधना प्रदान करणारे सद्गुरू म्हणतात.. जे ज्ञान आणि अज्ञानामध्ये अडकलेले नाही.. ते दोन्हीच्या पलीकडे आहे, अलिप्त आहे.. !

ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय..?  याचा गुरुबोध साधकाला देतात..  जेव्हा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असलेले साधन अभ्यासाने जागृत होते, तेव्हा ते साधकाला जागवू शकते.. कारण ते स्वतःला ज्ञान आणि अज्ञानाने बांधलेले नाही, तर ते पूर्णपणे मुक्त असे असते.. ! ॐ श्री गुरुदेव दत्त...