Sunday 19 August 2012

पैशाची हाव.... कशासाठी.... किती.... कोणासाठी....

जसे आपल्याला, टॉलस्टॉयच्या कथेतून माणसाला जमीन किती लागते याचे उत्तर मिळते..... पण यातून आपण काहीच बोध घेतला नाही असेच चित्र दिसते.... तसे, बघितले तर माणूस अनेक गोष्टींच्या पाठीमागे असा धावत असतो...... सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पैसा यांसारख्या गोष्टींचा लोभ सारखा त्याला पुढे ओढत असतो.... 

शेवटी माणसाचे खरे आयुष्य किती असते..... सत्य हेच कि माणसाचे खरे आयुष्य विलक्षण भयानक असते..... आणि या आयुष्याचे ध्येय काय असते..... पैसा, संपत्ती..... आता... पैशाशिवाय माणसाला जगता येणार नाही हे खरे, पण पैशाशिवाय माणूस जगू शकतो हेही खरे आहे...... 

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस नाही का..... आकाशातील सगळाच पाऊस अंगावर कोसळावा तसे आयुष्य आपल्यावर कोसळते..... पण नियती तुम्हाला जे आयुष्य देते.... त्याचा तुम्ही काय अन्वय लावता, हेही महत्त्वाचे ठरते.... आयुष्यात पैसा आणि संपत्ती, प्रतिष्ठा, याचे महत्त्व अपार आहे..... पण त्याहून माणसात जे जगायचे स्पिरिट असते..... ते अधिक महत्त्वाचे.... खूप उपेक्षा मिळाली आणि खूप प्रसिद्धीही मिळाली..... तर दुःख कशाला मानायचे..... पदरात पडलेले यश मला सदैव भानावर ठेवेल, सावध ठेवेल हेच बघायचे..... पैशासाठी झुरू नये..... 

ज्या पैशासाठी आपण आपले आयुष्य पणाला लावतो, तो पैसा माणसाला किती लागतो? असा प्रश्न विचारला.... तर आजकाल हेटाळणी होते, म्हंटले जाते..... अरे, अरे तुम्ही संन्यस्त वृत्तीचे झाला आहात किंवा तुम्हाला नैराश्य आले आहे वा आध्यात्मिक झाला आहात..... पण आज आपण पैसा पैसा करून आपला आनंद मात्र हरवून बसलो आहोत.... अधिक पैसा मिळवून आपण काय करतो.... रोजच्या जीवनात पेट्रोल, मोबाइल्स, टेलिफोन्स, लाइट बिल्स, कॉपोर्रेशन टॅक्स, इन्कमटॅक्स असे टॅक्स व बिले आपण भरत राहतो..... हे खर्च आता दैनंदिन गरजेचे बनतात.... 

म्हणजेच आपण जास्त पैशाच्या मागे लागून आपल्या गरजा नाहक वाढवत असतो..... या धावपळीत काही पाहायला, काहींचा आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही..... मग पैशाच्या या धावपळीत आनंदाची व आवडीची कामं राहून जातात..... याच पैशासाठी अनेकदा आपण आक्रमक होतो, विवेकबुद्धी व नैतिकता विसरतो..... इतरांना दुखावतो, अपशब्द वापरतो, आपणच आपले अवमूल्यन करत जातो..... शेवटी या पैशाचा इतका अतिरेक होतो कि एक दिवस सहन होत नाही व माणूस कोसळून पडतो.... 

कशासाठी पैसा? किती पैसा? कोणासाठी पैसा?..... खरोखरच पैशाशिवाय जगता येऊ शकते हे आपण जाणले पाहिजे.... पैशाचा अतिरेक टाळा..... पैसा पैसा करून आयुष्य फुकट घालवू नका..... आज गरजा ज्याने कमी केल्या तोच खरा आनंदी आहे..... जीवनात गरजांची जागा जेव्हा अपेक्षा घेतात तेव्हा ताण तणाव निर्माण होत जातात व जीवनात संघर्ष सुरु होतो.... आनंद हळू हळू हरवत जातो..... म्हणूनच आनंदी जीवनाचे रहस्य म्हणजे गरजा कमी करणे व समाधान मानणे..... 

बघा लवकर जागे व्हा... आनंदी जीवन जगा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment