Friday 14 September 2012


यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...
मन बुद्धीसह अहंकाराचे स्फुरण | श्वासांचा उगम जेथोनि रे ||
चित्तवृत्ती होवू दे, सरळ निर्मळ | परपीडा गरळ, टाकी वेगी ||
जाईन मी प्रेमे, तिथे माय माझी | भक्तजन वत्सल सद्गुरु राय ||
जिव्हेचे रमण रामरंगी होवो | स्मरण सोहम् भावे सर्वकाळ ||
जगातला प्रत्येक जीव एकमेकाशी एका अदृश्य धाग्याने जोडला गेला आहे.. असं अध्यात्म सांगतं.... यातील मैत्री नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया.... नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे.... जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत..... जे. कृष्णमूर्ती म्हणतात, “To be is to be related and to be related is to be in conflict....”.... दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच..... मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं.... कारण खूपवेळा ते निरपेक्ष नसतं.....
कधी कधी एखादी अनपेक्षित घटना व्यक्तीला अंतरबाह्य बदलून टाकते.... अनेक वेळा आपण आपल्या एखाद्या नात्याचा आणि व्यक्तीचा जो विचार करत असतो... त्याला धक्का बसून आपला दृष्टीकोन पूर्णतः बदलून जातो.... आपल्याच काही भावना एक मोठ प्रश्न चिन्ह घेऊन समोर येतात मग त्याची उत्तर शोधताना मनाची प्रचंड दमछाक होते.... खरच खर प्रेम म्हणतात ते असत का ह्या जगात..?.. की अनेकवेळा भावनिक गरजांच्या खेळाला प्रेमाच गोंडस रू देऊन आपण मोकळे होतो..?.. असा प्रश्न सामोरा येतो....
व्यवहाराच वर्गीकरण आपण करू शकतो... पण प्रेमाच तस करता येत नाही.... विशिष्ट संवेदना म्हणजे प्रेम अस... आपण नाही म्हणू शकत.... प्रेमाची अनेक रूप अनेक भावनिक पदर ते उलगडणे खूप कठीण.... प्रेमात जस आधी मी म्हटलं, की सगळ्यात महत्वाचा असतो तो आपल्या प्रेमाविषयी आणि व्यक्तीविषयी आदर.... हा आदर असतो त्या व्यक्तीच्या भावनांचा, त्याच्या आपल्याविषयी असलेल्या संवेदनेचा.... आपल्याच व्यक्तीचा अपमान जेव्हा आपण सहज करून मोकळे होतो... तेव्हा त्याला लागणारी भावनिक ठेच आपण कल्पना करू शकत नाही.... व्यक्ती जवळ असो की दूर कुणीतरी आपल्याशी आणि आपण त्याच्याशी प्रेमाच्या नात्याने निगडीत आहोत.... अस जेव्हा माहित असत, तेव्हा आपल्या मनावर संयम असण... ही तर अतिशय महत्वाची गोष्ट.... चंचलता नात्याला लौकर ग्रहण लावते....
पर्याय म्हणून आपल्या व्यक्तीचा विचार करण... हा त्यांच्यावर नकळत केलेला अन्याय असतो आणि सगळ्यात महत्वाच आपल्या व्यक्तीची मनापासून घेतलेली काळजी.... प्रेम हे भावनिक दृष्ट्या कुणावरतरी आणि कुणीतरी आपल्यावर अवलंबून रहाण आहे आणि जेव्हा हे माहित असत... तेव्हा होता होई तो त्या व्यक्तीची आणि त्याच्या हिताची काळजी हा आपल्या कर्तव्याचाच एक अविभाज्य भाग असतो.... वरील पैकी एका जरी गोष्टीला तिलांजली दिली गेली तर प्रेम कोमेजून जात.... परिस्थिती आणि वेळ कशीही असली... तरी आपल्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही... ह्याची काळजी घेण खूप गरजेच.... पण शेवटी आत्मसन्मान हा देखील अहंकारच त्याला मैत्रीच्या नात्यापेक्षा किती महत्व दयायचे हे व्यक्तीच्या विचार प्रगल्भतेवर अवलंबून असते....    
तुझ्यावाचून माझ काहीही अडत नाही... ह्या शब्दांपेक्षा तू आहेस म्हणून मी आहे... हे शब्द त्या व्यक्तीची तुम्हाला असलेली गरज अधोरेखित करत.... एकमेकांना एकमेकाची गरज ही असतेच....  हे सगळ पुस्तकी वाटत, पण पण खऱ्या अर्थाने तीच नाती बहरतात... ज्यात ह्या गोष्टी अंतर्भूत असतात.... शब्द आणि आपली वागणूक ह्याचा ताळमेळ असायला हवा.... अर्थात ज्यांना आपल प्रेम आणि व्यक्ती हवी असते तिथेच हे घडू शकत.... अन्यथा बोलायचे एक आणि करायचे एक.. अशी वृत्ती असेल तर.... काळाच्या ओघात वाहून जाणाऱ्या अनेक नात्यांपैकी एक नात... म्हणून प्रेम आयुष्यात आठवण म्हणूनच रहात.
त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या एखाद्या कृत्याचा काहीवेळा काहीजण चुकीचा अर्थ घेऊन.... त्या कृत्यामुळे त्याच्याबद्दलचे मत काहीजण चुकीचा घेत असतील... तेव्हा त्याच्या त्या कृत्याबदलची दुसरी बाजू त्याला दाखवणे.... म्हणजे त्या व्यक्तीकरता आपल्या मनात असणारी आदराची भावनाच दर्शवते असे मला वाटते.... कारण ती बाजू दाखवण्यामागे हेतू एवढाच असतो कि त्याचा तो आदर सर्वांनी करावा....
काहीवेळा त्यात त्या व्यक्तीचा अपमान व्हावा असा केव्हाही हेतू नसतो.... पण काळजीपोटी, आपलेपणामुळे ती व्यक्ती चुकत असेल, तर योग्य भान येण्यासाठी प्रेमापोटी ती केलेली कृती असू शकते.... इथे प्रेम अतुच्च्य दर्जाचे असते.... कारण आपल्या निर्मळ प्रेमापोटी ती व्यक्ती अयोग्य मार्गी वळू नये.... यासाठी आपण केलेले आपल्या नात्याचे बलिदान असू शकते.... माझ्याबद्दल काही का वाटेना, माझे काही होवो, पण तू चुकू नकोस.... हाच समर्पण भाव या निर्मळ वैश्विक प्रेमात असतो....  अशा व्यक्ती या दुसऱ्याचा आधी विचार करणाऱ्या, प्रेमळ, संवेदनशील, हळव्या आणि खुपश्या दैवीदृष्ट्या द्रष्ट्या असतात.... आणि मग अशा व्यक्तीबाबत खूपवेळा गैरसमज लवकर होतात.... कारण त्यांचा खरेपणा या जगाला मान्य नसतो.... एवढे निस्वार्थ कोणी असेल का..?.. असा प्रश्न स्वार्थी जगाला पडतो.... आणि ती व्यक्ती नाकारली जाते.... खोटारडी म्हणून अवहेलना तिची होते.... अहंकारी-मोठा आव आणणारी म्हणून निंदा केली जाते.... अशावेळी ती व्यक्ती काही बोलली तरी ते मान्य होत नाही... मग ती एवढेच बोलू शकते....                             खर सांगू का..?.. माझ्याजवळ फक्त खरेपणा आहे....
कुणाला काही वाटेल, पण असं.... जगणं फार कठीण आहे...
      माझ्या दृष्टीने जीवनाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंच्या शिकवणीनुसार वागायला हवे.... आयुष्यात दोनच गोष्टी जपायच्या... सत्व आणि तत्व हेच खरे.... मग आपण कधीच भरकटत नाही वा घाबरत नाही.... चराचरात परमेश्वर आहे हे जाणायला हवे.... एखाद्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव... यामुळे त्यांच्यातील अंतर्यामीकडे पाहतांना मनाला विचलित होऊ देऊ नये.... आपला सभोवताल हा केवळ आपल्या स्वतःच्याच विचारांचे आणि कृतींचे प्रतिबिंब असते.... जर आपण चांगले असलो तर जग चांगले दिसते.... आणि जर आपण वाईट असलो तर सर्व वाईट भासते.... जर आपण आपले मन शुद्ध केले तर सर्व जगही निर्मळ सुंदर असे बनते....
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो.... नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं.... सगळं अनुकूल असेल, तरच ते टिकून राहतं.... अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.... ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच.... माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं.... गुरुचे आणि शिष्याचे.... गुरुतत्वाचे आणि साधकाचे.... त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव....
ईश्वर, सद्गुरू मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात.... जर हे नाते खरोखरीचे असेल तर ते निरपेक्ष असतं.... कदाचित म्हणूनच या नात्याची कसोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो.... या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो.... या नात्याला अनेक विविध पदर असू शकतात.... या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं.... कारण यामागे अपार श्रद्धा असते.... श्रद्धा हाच यां नात्याचा मूळ गाभा असतो..... या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.....      
आपण नेहमीच योग्य विचार करतो असा काहीसा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो.... परंतु कधीतरी असही घडत की समोर घडलेली घटना आपण किती चुकीचे होतो हे दाखवून देते.... अशा वेळी गरज पडते ती आपल्याच विचारांचे ऑडीट करण्याची.... टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आणि ह्या दोन हातात एक हात आपलाही असतोच.... खूप वेळा एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून आपण मोकळे होतो, परंतु ह्या सगळ्यात आपण कुठे चुकलो त्याची शहानिशा करायची गरज आपल्याला कधीच वाटत नाही.... आपला स्वाभिमान, आपल्या अपेक्षा ह्यांना ठेच पोचली... की दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांची कदर आपणही करायला हवी होती हे लक्षात येत.... बघा, पण खूपवेळा असे होते... काहीजण लगेच सावरून घ्यायला तयार होतात, कारण चूक झाली, मान्य केली, झाल गेल विसरून जाउया... या मताचे ते असतात.... आणि खूपवेळा समोरचा भानावर येण्यासाठी किंवा अयोग्य चुकीच्या मार्गात अडकू नये म्हणाच ती कृती असते.... पण जे वारंवार चुका करतात, ती व्यक्ती मुळात अहंकारी, हट्टी, दुराग्रही, माझे तेच खरे अशी असू शकते.... अशी माणसे चूक, दोष मान्य न करता.... माझे काही होवो मी माझे तेच खरे करणार अशी टोकाची भूमिका घेऊन नाते तोडतात.... अशी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत.... खरे यश त्यांनी कधीच पाहिलेले नसते... कारण काम करताना, समाजात राहताना ते टीम वर्कने काम करू शकत नाहीत.... 
        
    नाती का तुटतात..?.. ह्याच अनेकदा बीज ह्यातच असत.... जी व्यक्ती मनापासून तुमच्यावर प्रेम करते तिला सतत गृहीत धरून चालण, ती एखाद्या गोष्टीने दुखावते ते माहित असूनही तीच गोष्ट करून... त्यांची आपल्या आयुष्यात काहीच किंमत नाही.... हे अप्रत्यक्षपणे त्याला दाखवून देण आणि सगळ्यात महत्वाच त्यांना सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्व देण.... टीम वर्कला काहीच महत्व न देणे.... खर तर कुणीतरी आपलंच आपल्यासाठी थांबलेलं असत, आपल्या सहवासासाठी, शब्दांसाठी आसुसलेल असत.... ते आपल्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत.... हे माहित असूनही आपण आपल्याच व्यक्तीच्या ह्या सगळ्या गरजांना दुर्लक्षित करतो.... पण ह्या सगळ्यात आपण अतिशय अमुल्य अशी गोष्ट गमावतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने "आपल माणूस"….एकदा तरी ह्या गोष्टीचा विचार करावा.... एकदा तरी ह्या चुकीच्या विचारांचं ऑडीट कराव आणि शिलकीचा जमाखर्च होईल अस आयुष्याच अकाऊट बनवावं….
माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा.... फक्त एकाने तो स्वीकार करून उपयोग नाही ते दोघांकडून झाले पाहिजे.... एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, शुध्द-निर्मळ व्यवहार, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा, आश्वासकपणा आणि एकमेकांपासून काही न लपवणे.... हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात..... नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का..?.. (आपुलकी, जिव्हाळा, आदर) हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव.... तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो.... वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो.... मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो....  अवघं जगणं सुंदर होऊन दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.... अशी पांखरून छाया, लावोनिया माया | आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया ||....

ॐ श्री गुरुदेव दत्त....

No comments:

Post a Comment