Wednesday 24 October 2012


विचारांचे सीमोल्लंघन करु.... मनात सुविचार भरु.....

क्षात्रवृत्तीची जोपासना करण्यासाठी सीमोल्लंघन करण्याचा संदेश देणारा हा दसरा सण…. आजच्या विज्ञान युगात जुन्या, बुरसटलेल्या, अंधविश्वासी विचारांच्या सीमारेषांचे उल्लघन करण्याची खरी गरज आहे.... आज आपली नीतीमूल्य - संस्कार जपून बदलत्या जगातील ज्ञान प्राप्त करून वैज्ञानिक प्रगती साधण्यात खरा पुरुषार्थ सामावलेला आहे..... सतत उद्यमशील राहून, उद्योगाच्या नाना क्षेत्रांत धडाडीने प्रवेश करून स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडण्यातच क्षात्रतेजाचं खरं दर्शन घडणार आहे..... 

मानापनाच्या खोट्या कल्पना झुगारून देऊन हुंड्यासारख्या असुरी प्रथा.... व त्यासाठी स्त्रीचा होणारा अघोरी छळ यातून तिची सुटका करून.... तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटण्यातच पुरुष जातीचं खरं कल्याण आहे.... शक्तिदेवीच्या उपासनेचा हाच खरा अर्थ आहे.... मुलगी होणार म्हणून  केली जाणारी भ्रुणहत्या थांबविण्यानेच आदिशक्तीची खरी आराधना केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे.... अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीयता, फुटिरता आणि धर्मांधतेचे तट ओलांडून जीवनातील खऱ्या सुखाचं सोनं आपल्याला लुटायच आहे.... शमी-आपट्यांच्या पानांच्या प्रतीकातून आज आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे.....

तसेच दुदैवाने आज भ्रष्टाचाराची समस्या सर्वव्यापी झालेली असली.... तरी तो समूळ नष्ट होईल.... अशी आशा ठेवली पाहिजे.... कारण आशा नसेल तर जीवनच व्यर्थ आहे.... मात्र भ्रष्टाचाराविरोधात ओरड करताना प्रत्येकाने आधी स्वत:ला तपासले पाहिजे, असे मी म्हणेन.... भ्रष्टाचाराची सवय सर्वांनाच लागली आहे ही वस्तुस्थिती आहे.... लाच घेणारा तसेच लाच देणारा हे दोघेही दोषी असतात.... म्हणूनच लाच देऊ करणारा रावण तुमच्यात लपला असेल.... तर आधी त्याला संपवा.... मी कोणत्याही परिस्थितीच कुणालाही लाच देणार नाही.... अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करावी आणि त्याचे पालन करावे.... तसे झाल्यास भ्रष्टाचाराचा नायनाट होण्याचा सुदिन नक्कीच उगवेल....

सकारात्मक...रचनात्मक विचार आणि कृती ही ख-या अर्थाने समाजाची चिरंतन प्रेरणा असते..... भारतीय पुराणात विजयादशमीच्या दिवसाचे महत्त्व सांगणार्‍या ज्या अनेक कथा प्रचलित आहेत... त्या सर्व कथांचे सार एकच आहे... ते म्हणजे, असत्यावर सत्याची मात आणि सुष्टांचा दुष्टांवर विजय.... सध्याच्या काळात अराजकाचे हे वारे रोखायचे असतील... तर विचार परिवर्तनाची गरज आहे.... हीच वेळ विचारांचे सीमोल्लंघन करण्याचीही आहे.... या सीमोल्लंघनाच्या संकल्पाचा दीप आजच मनात चेतवण्याची गरज आहे..... 

ॐ श्री गुरुदेव दत्त....

नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात....

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो…. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते…. खंडे नवमीला देव उठतात आणि मग येतो तो दसरा..... आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो…..

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.... दसऱ्याला `दशहरा’ असे म्हणतात…. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत…. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात… व शक्ती ने भारलेल्या असतात…. आसुरी शक्तीं वर दैवी शक्तींपनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस… म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात… या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात….

या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे.... आपट्याची पाने हे आप आणि तेज ही तत्त्वे ग्रहण करू शकतात.... ही पाने एकमेकांना देतात... तेव्हा व्यक्तीच्या हातावरील देवतांची केंद्र असलेले बिंदु कार्यरत होतात... आणि त्या तत्त्वाचा लाभ त्या व्यक्तीला होतो.... सोने हे लहानांनी मोठ्यांना देण्याचा संकेत आहे.... हे सोने देवालाही वाहतात....

शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्या ला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे…. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे….

१. दसऱ्याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते….

२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते….

३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात…. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश             ही पंचतत्त्वे आहेत….)

४. शमीकडून प्रक्षेपित होणार्याल तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर   प्रवाही बनवल्या जातात….

५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात… तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात… व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो….

विजयादशमी - दसऱ्याच्या....शुभ दिनी अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा…. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची…. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची… आणि लुटवायची हा दिवस…. म्हणूनच मित्रानो...

                        नको अवगुणी रावणाची साथ.... करूया वाईटावर सद्गुणांनी मात....                                                               

                                         लुटुनी सुवर्णमयी विचार धन.... करू समृद्ध सुविचारी आपले मन....

विजयादशमी - दसऱ्याच्या.... आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....


Tuesday 23 October 2012

पैसा प्रसिद्धी सर्वस्व अनर्थ.... तपमय यश जीवन सार्थ.... 

आजच्या एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत भारत हा तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला जगातील एकमेव देश असेल..... म्हणजेच तरुणांच्या यशापयशावर आपल्या देशाच्या वाटचालीची मदार राहणार आहे.... त्यामुळे या युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान कुठले.... तर तरुणांना जीवनात काय हवे आहे.... 

तारुण्य म्हटले, की ऊर्जा आणि काहीतरी नवे करण्याची जिद्द या गोष्टी ओघाने आल्याच..... समाजातील विषमता आणि भेदभाव पाहून अशी ऊर्जा आणि संवेदनशीलता असणारे अनेक तरुण अस्वस्थ होतात..... आपण काहीतरी करायलाच हवे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते.... पण नेमके काय करायचे.... याबाबत मात्र मुळातूनच गोंधळ असतो.... 

तुम्ही आयष्य एकदाच जगतात.... पण ते योग्य पद्धतीने जगलात.... तर एकदाच मिळालेले हे आयुष्यही पुरेसे असते..... फक्त पुरेसा पैसा आणि गरजा मोजण्यासाठी स्वतःचे योग्य माप वापरा.... दुसऱ्याच्या मापाने तुमचे आयुष्याचे गणित सोडवायाच प्रयत्न करू नका..... 

आजच्या तरुण पिढीने हे लवकरात लवकर जाणले पाहिजे..... फक्त पैसा, गाडी, बंगला अशा मोजता येणाऱ्या गोष्टी..... हे काही खऱ्या यशाचे परिमाण नसून.... दर दिवशी आपण थोडे शहाणे होत जाणे म्हणजे खरे यश.... 

संपत्ती व पैशापेक्षाही चारित्र्य महत्त्वाचे असते..... पण दुर्दैवाने आजच्या काळात चारित्र्य नसले.... तरी काही होत नाही.... पण पैसा नसला तर सर्वस्व नसते.... असा अनुचित समज रूढ होत आहे..... ज्यामुळे आपली तरुण पिढी उध्वस्त होऊ शकते.... यासाठी वेळीच सावध व्हा..... 

आपल्याकडे असे खुप आदर्श आहेत.... ज्यांनी दुर्बल परिस्थितीत स्वतःचे जीवन घडविले.... त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा.... पैसा सर्वस्व नाही... तर तुमचा दृष्टिकोन आणि चारित्र्यच तुमचे जीवन घडवीत असते.... 

आज आपल्याकडे कुणालाच थांबायला वेळच नाही.... आज सारे कसे इन्स्टंट झटपट हवे असते..... कुणाला दहा दिवसांत एखाद्या विषयात तज्ज्ञ व्हायचे आहे..... महिन्याभरात उद्योजक म्हणून मिरवायचे असते.... सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका रात्रीत श्रीमंत व्हायचे स्वप्न असते..... बघा, हे सगळे असे झालेच तर आपण जीवनात यशस्वी झालो.... असे मानायला आपण मोकळे होतो.... आजच्या तरुण पिढीला या... सब कुछ फटाफटचा... घातक रोग फारच मोठय़ा प्रमाणावर लागण झाल्याप्रमाणे झाला आहे..... 

आता बघा..... यात सगळीच चूक आजच्या तरुण पिढीची आहे का... तर नाही.... त्यांच्या पालकांनीच लहान कोवळ्या वयातच या झटपट- इन्स्टंट शिकवणीकडे त्यांना ढकलले.... आपल्या मुलांना श्रमाची, मेहनतीची, तपाची, साधनेची शिकवण देत नाहीत.... आजकाल शाळेच्या सुटीच्या 10-15 दिवसांत झटपट संस्कार वर्गात पाठवून चांगल्या संस्कार सौंदर्याने आपले मुल खुलून निघावे..... असे वाटणार्‍या पालकांची मुले झटपट- इन्स्टंट रोगाची लागण झालेलीच असणार नाहि का.... 

खरे तर कोणत्याही यशासाठी कधीच शॉर्टकट नसतो.... हे समजून देणे हाच खरा शाश्वत संस्कार आहे..... तप करावे तसा अभ्यास करावा.... उत्तम प्रकारे परीक्षा द्यावी मगच चिरंतन यशाची प्राप्ती होते.... हे ठामपणे तरुण पिढीच्या मनावर बिंबवले पाहिजे..... पण एकमात्र आहे.... त्यासाठी पालकांची तसेच तरुण पिढीचीही..... पैसा, प्रसिद्धी म्हणजेच यश, सर्वस्व असते.... या अपूर्ण विचारातून बाहेर पडायची तयारी हवी.... 

बघा, आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहेच.... पण पैसा सर्वस्व कधीच नाही.... प्रसिद्धीचा आनंद हा असतोच.... पण तेवढय़ानेच कुणी “ यशवंत “ होत नाही हेही तितकच खरे..... इथे आपल्याला समर्थ रामदासांचे अनमोल विचार फार तारून जातात..... समर्थांनी ‘सार’ निवडण्याचा फार मोलाचा सल्ला दिला आहे…. ‘सार’ म्हणजेच खरे यश…… ‘असार’ म्हणजे यशाचा भास होय..... 

                                 जाणल्याने ऐसे न करावे । सार तेचि शोधून घ्यावे । 
                                                           असार ते जाणोनि त्यागावे । वमन जैसे ।। 

बघा, यात यशप्राप्तीची मार्गदिशा अगदी स्पष्ट होते.... आपले आयुष्य यशस्वी बनवणे तसे सोपे नाही.... अविरत कष्ट, मेहनतीचे मोठे तप करूनच आपल्याला यशस्वी होता येते.... पण हे ‘तप’ म्हणजे तरी काय....? रोजच्या जगण्यातले कष्टमय मेहनतीने वागणेही कठीण तपच आहे..... एकवेळ सारे सोडून जंगलात जाऊन राहाणे सोपे आहे.... पण अशी प्रत्येक पावलावरची तपश्चर्या भारी अवघड आहे..... 

सर्मथ अशाच तपाची अपेक्षा व्यक्त करतात.... त्यांनी सांगितलेली चार सूत्रे अंगीकारली.... तर पैसा-प्रसिद्धी मिळेलच.... पण खर्‍या यशाचा मुकुट आपण शिरी धारण करू शकतो.... आज धीर सुटत चाललेल्या तरुण पिढीने या चतुसुत्रीचा नक्कीच शांतपणे विचार करायला हवा असे वाटते..... यशासाठी धीर धरायची तयारी ठेवावीच लागेल..... प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.... त्याला पर्याय नाहीच.... पण एकदा का चांगले यश मिळाले.... की मग मागे वळून बघावेच लागणार नाही..... यशपथावर सतत पुढे पुढेच जाता येईल.... सर्मथांनी सांगितलेली खालील चार सूत्रे तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे.... 

सूत्र पहिले 

                                जाणावे पराचे अंतर । उदासीनता निरंतर । 
                                                     नीतिन्यायासी अंतर । पडोचि नेदावे ।। 

आपल्याला इतरांचे मन नीट समजून घेता आले पाहिजे.... हे करताना जराही स्वार्थाचा विचार असता कामा नये..... इतरांशी वागताना नीती आणि न्याय याचा विसर पडू देऊ नये..... हे जमले तर आपल्यासोबतच अनेकजण उभे राहतात.... त्यांच्या सकारात्मकतेची शक्ती आपल्याला लाभते..... 

सूत्र दुसरे 

                                                 फड नासोचि नेदावा । 
                                                                 पडिला प्रसंग सावरावा ।। 

कोणत्याही चर्चेत... संवादात हे पथ्य पाळले की यश मिळते.... वादावादीचे, मतभेदाचे, विवादाचे प्रसंग येणारच.... अशा प्रसंगात ‘तेल’ ओतण्यापेक्षा आपल्या कुशलतेने तो प्रसंग आपल्याला सावरता आला पाहिजे..... इथे ‘फड’ म्हणजेच Team होय..... चांगली टीम जर का तुटली तर काय उपयोग.... हा फड सांभाळणे ‘ग्रुप डिस्कशन’साठी आवश्यक असते.... प्रत्येकाचा अहंकार manage करून कुशलतेने कमी करणे महत्वाचे.... 

सूत्र तिसरे 

                               दु:ख दुस-याचे जाणावे । ऐकून तरी वाटून घ्यावे । 
                                                                   बरे वाईट सोसावे । समुदायाचे ।। 

आपल्याला यशस्वी होण्यासाठी इतरांचे प्रश्न.... समस्या, अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.... प्रेमाने दुसर्‍याचे दु:ख जाणल्याने... त्यांचे बरे-वाईट सोसल्याने सार्‍यांची सद्भावना आपल्या पाठी उभी ठाकते.... सद्भावना म्हणजेच सदिच्छा.... चांगले आशीर्वाद.... यशासाठी त्याची खूप गरज असतेच..... 

सूत्र चौथे..... 

                                                       तऱ्हे भरोंच नये । 
                                                                     सुचावे नाना उपाये।। 

बघा, ज्याला यशस्वी व्हायचे आहे.... त्याने तर्‍हेवाईकपणा, स्वकल्लीपणा करता कामा नये.... म्हणजे आज मूड नाही... असे नको.... Multi Dimensional Approach ठेवावा..... कोणत्याही प्रसंगाला दोनच पर्याय नसतात.... There is always third Alternative..... तो शोधावा आणि सर्वात महत्त्वाचे ‘दीर्घ यत्ने’ करावे..... सोपे काम करण्यापेक्षा, प्रयत्नपूर्वक कठीण कार्य केल्यानेच खरे यश मिळते... हे विसरू नये.... Think Out of the Box Ideas if possibble.... 

बघा, अशी हि सर्मथप्रणीत ही चार सूत्रे आचरून मिळालेले यश शाश्वत यशच असेल..... तर शेवटी हेच जाणणे महत्वाचे.... यशाला कधीच ‘शॉर्टकट’ नसतोच नसतो.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....
विनम्रते यशवंत सर्वगुणे.... साकार स्वप्न पूर्णपणे..... 

आजकालच्या तरुणांना, सत्ताधा-यांना, श्रीमंताना तर नम्रता अगदीच नकोशी झाली आहे... मुख्यत्वे आज तरुण पिढी उन्मादी उद्धट होताना दिसते.... त्यांच्या बोलण्यातली मग्रुरी, मस्ती प्रत्येक वाक्यात जाणवते.... याला attitude असे गोंडस नामकरण सुद्धा झाले आहे..... 

मित्रांनो, विनयशीलता म्हणजे अहंकारावर नियंत्रण.... विनय म्हणजे लाचारी नाही…. विनय म्हणजे ओतप्रोत भरलेपण…. संपन्नता ज्ञानाची – विद्धवत्तेची असो…. धनाची असो वा सत्तेची असो…. ती विनयातून अधिक नेमकी लक्षात येते…. पण आजकाल याचा विसर पडत चालला आहे…. आणि पालकही याला मुलांचे.... वाक् चातुर्य, स्पष्टवक्तेपण, good attitude, बोलण्याची हुशारी, बिनधास्तपणा अशी गोंडस नावे देऊन त्यांचे या गुणाबद्दल कौतुकच करताना दिसतात.... यामुळे मुलांना त्यांच्या दोषांची जाणीव होत नाही.... उलट आपण वागतो ते योग्य.... असे वाटून अश्या वागण्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखेच होते.... पण याचे परिणाम त्यांना उर्वरित पूर्ण आयुष्यात भोगावे लागतात.... यामुळे वेळीच सावध झालेले चांगले..... 

आजकाल, अनेकांना हे विनयाचे तंत्र दुबळेपणाचे वाटते…. मोडेन पण वाकणार नाही.... असे म्हणण्यात त्यांना भूषण वाटते…. मर्दुमकी म्हणजे उद्धटपणा असेच काहीसे सूत्र त्यांच्या डोक्यात असते…. इथे संत तुकारामांचा एक अभंग सांगतो..... महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।। बघा, या सूत्राने संत तुकारामांनी दुबळेपणा, लाचारीला थारा दिलेला नाही..... उलट “ काल जयी “ होण्याचा मंत्रच दिला आहे.... 

आता याचा अर्थ काय तर.... बघा, महापूर आला की मोठे वृक्ष उन्मळून पडतात…. पण लहान ‘लव्हाळे’ मात्र वाचतात…. का तर महापुराचा माराच असा असतो…. की भक्कम पाय रोवून उभी असलेली झाडे मुळापासून उखडली जातात…. पण “लव्हाळे” मात्र पुराचा तडाखा विनम्रतेने स्वीकारतात.... स्वत:ला वाचवतात…. मोठे होतात.... विनम्रता हा मोठेपणाला पूरक गुण आहे…. सामर्थ्य जेवढे अधिक, विनय तेवढा अधिक असतो.... सामर्थ्य हवेच.... पण विनयामुळेच ते शोभून दिसते.... 

माणूस जसा जसा विचारांनी प्रगल्भ होतो.... तसा त्याचा विनय वाढतो…. प्रख्यात चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशिअसचे एक वाक्य खूप नेमकेपणाने विनयाचे महत्त्व सांगते..... Humility is the solid foundation of all the virtues.... म्हणजेच आपल्या साऱ्या मूल्यांचा भक्कम पाया आहे आपला विनय..... बघा ना, आपला सारा मोठेपणा विनयाशिवाय वांझोटा होऊन जातो.... 

इथे एक उदाहरण देतो.... बघा संत कबीर असे म्हणतात.... 

                                     बड़ा हुआ तो क्या हुआ.... जैसे पेड़ खजूर.... 
                                                         पंथी को छाया नहीं... फल लागे अति दूर.... 

म्हणजेच ताड-खजुरांच्या झाडांना फळे लागत असतातच.... पण त्या फळांचा लाभ सहजा-सहजी भुकेल्या वाटसरूला होऊ शकत नाही.... फळेतर दूरच... त्याची सावली देखील मिळत नाही.... मग सांगा.... इतरांना ऐनवेळी कसलाच लाभ नसलेल्या मोठेपणाला काय अर्थ आहे का ?.... याउलट आंब्याचे झाड फळांनी डवरते.... आणि सहजतेने आपली फळे सर्वांना देते.... अगदी दगड मारणा-यालाही फळाचाच लाभ होतो.... सावलीचा लाभ तर बारा महिने देते.... म्हणूनच म्हणतो.... ‘बड़ा हुआ तो क्या हुआ... जैसे पेड़ खजूर.... पंथी को छाया नहीं.... फल लागे अति दूर।’ हे आपल्याला एकदा का समजले की विनयाचे महत्त्व पटते..... 

आज एकंदर परिस्थिती पाहता जीवनशैलीत खुपच फरक आलाय.... आजच्या पिढीला अनुकरण करायला आवडते.... गर्दीतल्या सगळ्यांसारखे वाहायला आवडते.... माध्यमाच्या टीव्ही चैनेलासाराख्या माध्यमाच्या रिच मुळे असेल... पण नकळत आपण सगळी एका मास हिप्नोटीक स्पेल मध्ये वावरतोय.... उदाहरण क्रिकेटचे घ्या... जे दाखवले जाते ते पाहतो.... दुस-याच्या नजरेने पाहतो.... आणि प्रतिसाद त्यांना आपेक्षित आहे असाच देतो..... 

"ये ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट है बॉस,..... ना तमीजसे खेला जाता है... ना तमीज से देखा जाता है..... याला आजची पिढी Attitude बोलते... ते तिला आवडते.... त्याचे अनुकरण होते..... मग विनयशीलता, नम्रता राहते बाजूला.... आता वास्तविक तथाकथित जंटल मन गेमला म्हणजेच क्रिकेटला त्यांनी.... म्हणजेच केवळ ध्यानाकर्षण ध्येय असलेल्यांनी कधी बदलून कधी टाकले..... निदान पाहणा-याला तरी समजले नाही..... मग आता लक्षवेधक कामगिरी आता केवळ द्रविडची न होता..... श्रीसंतने मथ्यू हेडनला कशी खुन्नस दिली ते वारंवार बघितली जाते..... यावर हिरीरीने चर्चा होतात...... छात्या फुगतात..... त्याचे अनुकरण केले जाते... माझ्यामते करायचे तर तेंडूलकरचे अनुकरण करा.... विनम्रतेने खुनन्स कशी देतात ते शिका.... 

म्हणूनच म्हणतो, या मास हिप्नोटीक गर्दीत वाहू नका.... स्वत:च्या जागृतीने जगा..... आपण गर्दीतलेच एक असतो तेव्हा असेच होते.... एकाने दगड उचलला कि लगेच अनेक जन सरसावतात.... जसे चुकून एकाने सिग्नल मोडला... कि बाकीच्यांचे तंत्र सुटतेच... सिग्नलची शहानिशा न करता आपण त्यांच्या मागे जातोच.... यासाठीच स्वत:च्या जागृतीने जगायचे.... तुम्ही ठरवाल तसेच होणार हे मात्र नक्की.... 

मित्रांनो, तारुण्यात जोश नक्कीच हवाच असतो..... पण तो जोश... तो जोम परीक्षेत गुणसंपदा मिळवताना हवा.... ते ज्ञानाचे, विद्वत्तेचे ऐश्वर्य मिळाले.... की यश हे लाभतेच.... मग विनम्र होता येणे हेही महत्त्वाचे असते.... असे संतुलित व्यक्तित्व विनम्रतेच्या प्राप्तीने निर्माण होते.... म्हणून वेळीच सावध होऊन विनयाला दुर्बलतेशी जोडून आपण जीवनाचा पाया खिळखिळा करून टाकू नका.... 

आता इथे पालकांचेहि कर्तव्य आहे.... आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणे.... जर योग्य संस्कार झाले तर त्यांच्याच मुलाचे भवितव्य व पर्यायाने समाजचे, देशाचे भवितव्य उज्वल होईल.... बघा, लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात.... की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात… ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात... 

चांगल्या संस्कारांनी..... सहनशक्ती, संयम, चिकाटी, अंगमेहनत, कष्ट यासारखे गुण वाढीला लागतात.,,, स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते.... दुस-या व्यक्तीचा अपमान करू नये.... असे वागणे, बोलणे अयोग्य.... असे संस्कार बालपणीच झाले.... तर असंगाशी संग होत नाही.... पुढे आपसात संघर्ष होत नाहीत.... समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होत जाते.... विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात.... तसेच आत्मवंचना होत नाही.... अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.... 

आपल्यातील अहंकाराला खतपाणी न घालता.... आपल्याला पुष्कळच प्रगती करायची आहे..... याची मनाशी खूणगाठ बांधून विनम्रता हा गुण अंगी बाणवायचा.... माझ्यापेक्षा हुशार बोलण्यात वागण्यात कोणी दिसतच नाही.... असे वाटायला लागणे हाच तर.... सर्वात मोठा धोका आहे..... तसे होऊ नये म्हणून विनम्रता अंगी बाणवा.... असे केले नाही तर.... समर्थांनी सांगितलेच आहे..... 

                                      मना सांग पा रावणा काय जाले। 
                                                              अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।। 

शेवटी काय तर, कोणतेही कार्य, कृती करताना.... दुस-यांचा विचार करणे... अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे.... हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत विनम्र होण्यासाठी पुरेशा असाव्यात.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

दुर्गे दुर्घट भारी....


सद्गुरु तुझे भाव रूप । देवी जैसें का स्वरूप । तैसें गीतातत्व अरूप । नित्यनूतन दाविसी ॥


हा ज्ञान वेदार्थसागरू । तो स्वयें सर्वेश्वरू । गुरु शंकरानंद कल्पतरू । प्रत्यक्ष बोधीतसे ॥


सद्गुरु चरणांना वंदन करून देवीची आरती यावर सद्गुरुंनी बोधलेले चिंतनात्मक विचार आणि इतर काही संदर्भ घेऊन चिंतन आपण संपादित करू या..


नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आणि त्यां अनुषंगाने होणाऱ्या देवीच्या आरत्या.. आरती म्हणताना आपल्याला ती किती समजली आहे आणि का करत आहोत यावर चिंतनात्मक अभ्यास.. गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो.. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो..  देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत थोडक्यात माहिती किंवा इतिहास असा.. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमी दिवशी ह्या महिषासुराचा वध केला.. आता इथे जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसाच देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया.. सुखकर्ता दु:खहर्ता चिंतनात म्हटल्याप्रमाणंच आरती अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी..


आज देवीच्या आरतीचा थोडक्यात अभ्यास करुया..


दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |


वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१||


जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ||


त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही |


साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२||     जयदेवी जयदेवी ......


प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा |


अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३||    जयदेवी जयदेवी ......


देवीची आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद आहे.. नरहरी हे नाव आरतीत येतं.. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त.. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं.. अशी कथा आपल्याला परिचित आहे.. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांना आरती स्फुरली असावी.. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे.. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण उगाचच त्याबाबत जास्त विचार न करता आपला अभ्यास करुया..


आरती कोणी रचली ह्याबाबत विवाद न करता आरती शक्तीरूपी  दुर्गा देवीची आहे हे मात्र ढोबळपणे नक्की समजून येतं.. मात्र ह्याबाबत आपण थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे.. म्हणजे नेमकी आरती कुणाची केली आहे..?


दहा दिवस उत्सव मंडळात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची.. विविध शक्तीपीठ आणि देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची..?.. कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं.. 'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं..


इथं एक संबधार्थक विशेषण दिसतं.. सुरवरईश्वरवरदा.. सुरवरांनाच  म्हणजे देवतांनाच नाहीतर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे.. तिची ही आरती आहे..


पण असं काही असतं का..?.. थोडं मागं जाऊ.. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा..! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली.. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वरी परमतत्व.. तत्वरूपी तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो..


मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या scale वर हे सगळं सुरु असतं.. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक पण सूक्ष्म विचार करावा लागतो.. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील, त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी-vacuum of space तरी 'आहे' ना..?)


त्रिभुवन- पृथ्वी, अवकाश आणि स्वर्ग ही तिन्ही जगे, (भुवन-लोक).. म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया (स्त्रोत).. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे.. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे..


या अनंत कोटी ब्रह्माण्डची निर्मिती, संचलन, संहार व पुन्हा निर्मिती हे ज्या मुळे होते, तिला आपण देवी किंवा मुळ प्रकृती म्हणतो.. ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं).. त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो..


तिला आपण मानवानंच, देवीरूप, माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी, म्हणून सगुणात आणली.. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे.. असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या गुरूंची आठवण करुन देतो.. तसंच ही मूर्ती भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे..


आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी.. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं.. अस आहे का..? आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का.? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का..?  


आपण ह्याचा असा विचार करू.. महिष म्हणजे रेडा.. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे.. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे.. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही..  तर मी कोण..?.. माझं जन्माचं प्रयोजन काय..?.. ध्येय काय..? ते समजण्यासाठी काय करावं लागतं..? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान..


इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे.. मात्र ही वस्तुस्थिती आहे.. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत.. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध.. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे साधकाच्या आयुष्याचं ध्येय आहे..


तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन, साधक अंतरी स्थित शक्तिरूप दुर्गामातेला प्रसन्न करू शकतो.. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे..


वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते.. देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे.. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही एक विचार होऊ शकतो.. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे.. यातून बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे.. म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी.. तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे..


अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी.. इथं पुन्हा थांबायची गरज आहे.. काय आहेत हे शब्द..? अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली NGO नाही..! खरंतर, कोण अनाथ आहे..? करुणा म्हणजे काय..? विस्तारी म्हणजे..? आहे का मुळात करुणा..? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय..?


इथं थोडा पारमार्थिक विचार आहे.. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात.. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा 'मी', मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो.. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो, तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना.. सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो..


बघा, धोनी-सचिन रिटायर झाले.. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण आता काहींना आनंद वाटेना.. म्हणजे सुख खेळात आहे की बघण्यात..?  मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर खूप सुंदर हिरे आणि सोने दिसतेय.. सुख वाटेल..?  तीच गोष्ट दुसरीकडून.. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल..


सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे..!! अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे.. इथे करुणा उत्पन्न करुन का नाही म्हटले आहें..? कारण देवीची करुणा आधीपासूनच आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये..


'एकोऽहम बहुस्याम' - एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाही आहे ना..? हीच ती करुणा.. माते, तुझी करुणा पसरव.. (माते अंबा, आज मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु मी जिथे आहे तिथे, तू तुझी करुणा वाढवू शकतेस.. आमचे अज्ञान दूर करू शकतेस)  ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे..? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार काही प्रमाणात कमी होत जातो..


पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात.. पुन्हा तेच आहे.. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर.. हारि पडलोय- कंटाळलोय.. या संकटाचं निवारण कर..


जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो.. ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो.. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही..


त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते.. मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं.. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी परमतत्वाची, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं.. दृष्टीकोनच बदलून जातो..


पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे.. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) साही- सहा (वेद, वेदांत, सांख्य, योग, न्याय आणि मीमांसा या सहा तत्त्वज्ञानाचे अनुयायी), विचार करुन करुन (जणू प्रवाह) पतित झाले, (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही..


आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे.. पण थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही.. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे तुझ्या स्वरूपाचे-शक्तीचे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे.. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस.. इथे अट 'भक्त' असण्याची आहे..!


प्रसन्न वदन.. अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो.. संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड.. इथं परत थांबावं लागतं.. इथे त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर..?  भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुऱ्हाडीने तोडल्यासारखं तोड, असं आहे का..?   नाही, तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल, तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचा अर्थ आहे..


समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल.. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो.. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही..


एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं.. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच.. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली.. प्रतिकूल संवेदनात दुखःम.. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो..


मात्र देवी-मातेच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही.. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर काहिही, जाण्यानं का हळहळ करायची..? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार, (प्रारब्ध भोग) कर्माचा सिद्धांत ह्या एका assumption  ने सुटतो..


इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता' योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं..


मात्र इथं कुठलाही निराशावाद नाही.. कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.. असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात.. भव म्हणजे संसार.. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते.. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन, तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे..


पण इथे प्रश्न पडतो.. माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल..?  या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चांगल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी..  माझेपण / देहबुद्धी आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे..! मी आणि "तो" कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी, तिथे द्वैत सरले..!


मग कर्म कसे करायचे..?  कार्य घड्णार कसे..?  कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा..?  ज्याच्याबद्दल माझेपण-आत्मियता नाही ते होणार कसे..?.. असाच काहीसा प्रश्न पडतो..!!..    आता हे असं नेमकं कसं आहे..!.. काय आहे..!.. काय होतं हे पूर्ण सत्य जाणायचे असेल, तर त्यासाठी गुरुप्रदित  साधना आणि अभ्यास हवाच आणि तो करताना लीनतेने गुरुचरणी साक्षित्वाने असावे.. जर आपल्याला ज्ञान हव तर सद्गुरूपुढे पूर्ण शरणागती शिवाय पर्याय नाही..


माझे माझे लोप पावू दे.. तुझे तुझे उगवू दे..  यथार्थपणे कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो, कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा श्रद्धाभाव, वृत्ती, परिस्थिती, काळवेळ यावर अवलंबून आहे.. काय योग्य आणि काय अयोग्य हे खरे सत्य कळण्यासाठी सद्गुरूला नम्रपणे शरण जाण्याशिवाय पर्याय नाहीच..


गीतेतील कर्म हे साध्य नाही, तर ते ईश्वराची.. कर्म कुसुमानि पूजा करून त्यास प्रसन्न करून घेण्याचे साधन आहे.. ज्ञान-ईश्वरी गीतेत, जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे.. कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे, आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे..!


 आज आपण या गुरुरूपी दुर्गामातेला पूर्णपणे शरण जाऊन सांगुया..


         आदिशक्ती तू आदिमाया तू..     तू जगज्जननी लयकारी तू..

                              कर्म साधन्या कार्यकारी तू..     सर्व चराचरी शक्तिरूप तू..

         या कलियुगी संकट समयी..    षड असुर घोर विनाश घडवी.. 

                             नाश करण्या असुर प्रवृत्ती..     दे मज बळ आदिशक्ती.. आदिशक्ती.. 

         अपराध क्षमा कर जगदंबे..     पदरी बालका घे तू अंबे.. 

                              धाव संकटी भ्रांती नाशिके..  शरण तुझला  पाव अंबिके.. पाव अंबिके..  


ॐ श्री गुरुदेव दत्त...





सत्संग म्हणजे काय.? (चिंतनकथा)

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले... "देवा सत्संग सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा"? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका किटकाचा निर्देश करून सांगितले... कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल... नारद मुनी त्या किटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले "सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?".. कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला... प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले म्हणाले.. देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला आहे, आता तुम्हीच उत्तर सांगा... 

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले... "तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला... पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच... नारदमुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे... कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले आहेत... 

अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले... म्हणाले "देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू पण... अहो मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत... अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात" तेंव्हा देव त्यांना म्हणाले... "त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल..." दुखी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला... त्यानेही नजर वळवून त्यांचेकडे पहिले आणि ते तेथेच लुडकले... 

नारदमुनी घाबरून देवांकडे परत आले... तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले "राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे... त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल... नारदांनी विचार केला आतापर्यंत कीटक, पोपट व बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही... पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात... तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले... सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो..?.. प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात... 

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला... तेंव्हा मी कीटक होतो.. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो... नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यातच मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला... पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहामद्धे श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला... आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व हि प्राप्त झाले... हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे... ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत... 

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाहि कळला... "नारायण नारायण" म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले "देवा जशी आपली लीला आघाद तशीच आपली समजावून देण्याची पद्धतहि दिव्यच आहे"...

म्हणूनच, मित्रांनो जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे... बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले, तर बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात... या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो... ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला... श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला... याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वोश्रेष्ठ असुनही त्यांचा नाश झाला... आपण ज्यासोबत रहातो.. त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो... संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात, तेंव्हा पहा संगत कशी निवडायची ते... ॐ श्री गुरुदेव दत्त...


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे आठवे रूप 'महागौरी'...

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।



दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय..... दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.... महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात.... भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही.... तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो.... या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे.... या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे.... या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.... 

महागौरीला चार भुजा आहेत.... वृषभ तिचे वाहन आहे.... तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे.... वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे... महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.... 

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता- जन्म कोटि लगि रगर हमारी। बर ॐ संभु न त रह ॐ कुँआरी।।

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते.... तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली.... तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.... देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.... आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे.... तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते.... महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते.... तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते.... तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे.... देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं....


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे नववे रूप 'सिद्धीदात्री'....

सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।



दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय.... ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे.... दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते.... ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते....

अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.... देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.... भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या.... यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते.... या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात....

देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे.... तिचे वाहन सिंह आहे.... ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते.... तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे....

देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत.... तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो.... त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो.... नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे.... या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

Sunday 21 October 2012

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री'.....

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।



दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे..... नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.... यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात.... या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते.... तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो.... त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो.... त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते....

या देवीचा रंग काळा आहे.... डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत.... गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे.... तिला तीन डोळे आहेत.... हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत.... ते चमकदार आहेत....

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.... गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे.... वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते.... उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे.... तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे....

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे.... परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे.... यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही.... देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.... राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात.... ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे.... या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.... कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे....

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे.... ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही.... आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....
आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे सहावे रूप 'कात्यायनी' .....

चन्द्रहासोज्जवलकरा शार्दूलावरवाहना ।

कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवद्यातिनी ।।




दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते...... दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते..... या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते..... योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे.... या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो.... परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते....

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे.... कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते.... त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला.... या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला.... त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली.... भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.... भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला....

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला... तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले.... महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली.... म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले.... अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता... सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता.... अशी ही कथा पुराणात आहे....

कात्यायनी अमाप फलदायक आहे..... कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती.... ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे... कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे.... तिला चार भुजा आहेत.... देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे.... डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.... तिचे वाहन सिंह आहे....

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते... तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो.... जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो.... तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.... सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

आद्यशक्तीची विविध रूपे दर्शविणारा नवरात्र उत्सव.... 

आपली भारतीय संस्कृती फार पुरातन आहे..... आपले पूर्वज निसर्गप्रेमी, निसर्ग पूजक व मूर्तीपूजक होते.... मानवी जीवनात आराध्य दैवतांची आराधना उपासना याला फार महत्व आहे.... जगामध्ये अशी कोणतीही नैतिकमूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत.... तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते.... 

मानवी जीवनात स्थैर्य प्राप्त होण्यासाठी व आत्मिक बल वाढवून आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उपासनेची अत्यंत गरज आहे.... त्यादृष्टीने भारतीय सणात नवरात्र, घटस्थापना, दसरा हा एक महत्वाचा सण गणला जातो.... नवरात्र - दसरा हा एक शक्तीपूजा तसेच शक्तीची अनेक रुपे आणि महिमा दर्शविणारा सण आहे..... 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे.... महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आद्य देवांच्या पुष्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली.... या दैवी शक्तीने म्हणजेच जगदंबेने नऊ दिवस अविरत युध्द करून महिषासुराला मारले.... असुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिले.... ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा.... आपण या दिवसात आईजवळ शक्ती मागायची.... व आपल्यातील असुरी प्रवृत्तींवर विजय मिळवायचा.... 

नवरात्रीचे महत्व म्हणजे देवी शक्तीमाता त्रास देणार्‍या असुरांशी विविध रुपे धारण करून.... असुरी शक्तींशी अहोरात्र युध्द करून विजय प्राप्त करते.... म्हणजेच सर्वांच्या मुळाशी शक्तीच प्रेरक आहे..... म्हणूनच मूळ ओंकार तो ध्वनी.... तूज नाम ही भवानी... असे म्हंटले जाते.... देवीची विविध नांवे, रुपे, स्थाने व पीठे आहेत.... एकतत्वात विविधतत्व आहे.... जसे सोने हे एकच असेल तरी त्याच्यापासून विविध नक्षीचे आकाराचे दागिने तयार होतात... तसेच देवी आदिशक्तींची विविध रुपे व नावे आहेत.... 

साधकांसाठी नवरात्र म्हणजे उपासना करण्याचे नउ दिवस आहेत.... नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीचे तत्व..... इतर दिवसांच्या तुलनेत सार्वाधिक प्रमाणात कार्यरत असते त्याचा लाभ साधकांना साधनेत मिळतो....
  • महाकाली.... (शक्तिचे प्रतिक).... पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी देवीचे पूजन करायचे.... 
  • सत्वगुणी.... महालक्ष्मी (ऐश्वर्याचे प्रतिक)..... दुसरे तीन दिवस सत्वगुण वाढविण्यासाठी देवीचे पूजन करायाचे.... 
  • महासरस्वती.... (ज्ञानाचे प्रतिक)..... शेवटचे तीन दिवस साधना तीव्र करण्यासाठी देवीचे पूजन करायचे....

तसेच फक्त उपवास करायचा म्हणून नको.... उपवास म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे..... उपवास याचा अर्थ असा आहे.... उप म्हणजे जवळ जाणे.... वास करणे म्हणजे देवतांच्या सानिध्यात जाणे.... चला तर, घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भारून टाका.... तीव्र साधनेने देवीला प्रसन्न करुया.... 


ॐ श्री गुरुदेव दत्त ..... आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

Saturday 20 October 2012

स्वप्न पाही आपुले मन.... पूर्ण कराया कष्टवावे तन.... 
                              जेणे सुखी सकल जन.... तेची सर्वोच्च ध्येय मान.... 

        मित्रांनो, अस म्हणतात.... स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत.... खरेही आहे ते.... पण स्वप्न पूर्ण करायचे म्हंटले तर.... एखाद्या स्वप्न पुर्ण झालेल्या स्वप्नवेड्याला विचारा.... त्याने स्वप्न पुर्ण करण्यासाठी काय किंमत चुकवली असेल ते.... बघा, तशी अनेक लोक आयुष्यात स्वप्न पाहतात... पण काहींचीच स्वप्न पुर्ण होतात.... यात त्यांचे नशिब वैगेरे काही नसते... फक्त त्यांनी घेतलेली मेहनत... कष्ट केलेले असते आणि त्याचेच त्याना फळ मिळते.... प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरूवात लहान स्वप्नापासुन होते.... आणि अशीच लोक त्याची स्वप्न पुर्ण करतात.... 

        जोपर्यंत माणूस कुठलं स्वप्नं पाहत नाही.... अन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम घेत नाही... तोपर्यंत यश मिळणं हि कठीण गोष्टच असते... कधी कधी शेकडो प्रयत्न करूनही यश मिळत नाही... म्हणून हिम्मत हरणारे लाखो आहेत.... पण जेव्हा दहा हजार वेळा प्रयत्न केल्यावर यशस्वी झालेल्या एडिसनची कहाणी त्यांना कळेल... तेहाच त्यांना यशासाठी किती संघर्ष करावा लागतो हे कळेल.... 

        बघा, या जगात तर भीक सुध्दा फुकट मिळत नाही.... ती सुध्दा कष्टाने मागावी लागते.... मग आपले स्वप्न देव कशाला फुकट पुर्ण करेल..... कष्टाला- मेहनतीला पर्याय कसा काय असु शकतो.... बघा, देव जरी पृथ्वीवर आला..... तर त्यालाही त्याच्या स्वप्नांसाठी लढावेच लागेल... मग आपली काय लायकी..... तेव्हा आपल्यालाही लढावे लागेल.... यशासाठी कष्ट मेहनतीला कोणताही पर्याय नाहीच.... 

       मित्रांनो, कोणत्याही यशासाठी मनामध्ये ध्येय गाठण्याच्या महत्त्वाकांक्षेची ज्योत पेटवावीच लागते... उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी उच्च विचारांची आणि भरपूर मेहनतीची कष्टाची गरज असतेच.... तसेच प्रत्येक वेळी आपल्या हाती यश येईलच असे नसते... पण अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा त्या चिकाटीने उभे राहून प्रयत्न करावेच लागतात..... अपयश ज्या गोष्टींमुळे आले त्या गोष्टी टाळाव्याच लागतात..... आणि सकारात्मक विचारांनी त्या दिशेकडे वाटचाल करावी लागते.... मग नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता.... 

     मित्रांनो, जीवनात आलेले अपयश हे भरपूर गोष्टी शिकवून जाते.... आपली शिकण्याची समजण्याची तयारी मात्र हवी.... आणि सहजासहजी मिळालेल्या यशाची किंमत शून्य असते.... त्यामुळे चुकीच्या मार्गाने लवकरात लवकर यश मिळवण्याच्या भानगडीत न पडता.... स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने त्यामागे धावा.... थोडा वेळ लागेल.... आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी, पण त्याची किंमत तुम्हाला नाकीच माहिती असेल.... आणि मनाला ध्येयपूर्तीचे समाधान ही असेल.... 

      बघा, मित्रांनो आपले जीवन खुप सुंदर आहे..... एकदा आयुष्याशी झुंज देवुन पाहाच, ध्येय निश्चित करून योग्य मार्ग निवडून त्य मार्गी चाला. आपला ध्येय मार्ग आपल्या मेहनतीने, कष्टाने, कौशल्याने, कलागुणांनी प्रकाशमान करून उजळून टाका.... यशाची अमृत चव चाखा.... स्वःताचे नवे पर्व निर्माण करा....

 ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday 19 October 2012

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता'

सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।



दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते...... नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते..... या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते..... भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.....

भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात..... ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते.... पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे.... भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते..... स्कंदमाता चारभुजाधारी आहे.... तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे....

डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे.... त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे.... या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे..... ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते..... यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते.... तिचे वाहन सिंह आहे....

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे.... यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते.... सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते.... यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे.... सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे....

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते.... मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो.... त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.... स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते.... सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते.... आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.... या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही...

आदिशक्ती नमस्तुभ्यं....
आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख.... दुर्गेचे चवथे रूप 'कुष्मांडा'....

सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।।



दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे..... आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते..... संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात.... कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे.... या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते....

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते..... या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे.... सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती.... म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे....

या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे.... तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे..... तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.... तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात.... ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे....

देवीच्या आठ भुजा आहेत.... ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.... तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे.... आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे....

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो.... या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते.... या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.... मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.... कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते.... त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं....

Thursday 18 October 2012


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख..... दुर्गेचे तिसरे रूप 'चंद्रघंटा''....

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।


दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे..... नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते.... तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.... या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते.... चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते..... दिव्य सुगंधाचा अनुभव येतो.... किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो.... हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात....

देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे..... तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते.... शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे..... या देवीला दहा हात आहेत.... या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.... तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते....

माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते.... माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते.... तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.... तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो.... . या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो.... या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे.... या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.....

आवाजात मधुरता येते.... माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.... आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा.... तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते.... आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे.... इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे.....

आदिशक्ती नमस्तुभ्यं.....
                                        
मित्रांनो, आज आपण ऑप्रा विन्फ्रे यांचे व्यक्तिमत्व जाणूया.... 

मित्रांनो, ऑप्रा विन्फ्रे आज सगळ्यात श्रीमंत अॅफ्रो-अमेरिकन स्त्री आहे..... तसेच जगातील खूप प्रभावी व्यक्तिमत्त्वाची स्त्री आहे..... पण इथवर पोहोचण्यामागे तिचा फार मोठा जीवन संघर्षहि आहे..... कमालीचं दारिद्य ते ३२ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा प्रवास तिने केलाय..... हे करताना तिने आयुष्यात खूप काही पाहिलंय, सोसलंय..... 

ऑप्रा विन्फ्रे विवाहित नसलेल्या जोडप्याची मुलगी..... तिच्या आईला तिला पोसणं म्हणजे कठीणच होतं.... मग अशावेळी तिची रवानगी तिच्या आजीआजोबांकडे करण्यात आली होती.... तिथेही गरीबी आणि आजूबाजूला दारिद्य, गुन्हे, ड्रग्ज, व्यसनाधीन पुरुषांकडून मारहाण, अत्याचार असं सगळं समोरं होतंच......  अशा परिस्थितीत विन्फ्रेच्या वाट्याला वेगळं काही येण्याची शक्यताच नव्हती. ...... ऑप्रा विन्फ्रेचे आयुष्य गरिबीच्या चटक्यांनी भाजून निघालं होतं….. ९ व्या वर्षी बलात्काराचा भीषण अनुभव तिला घ्यावा लागला….. १४ व्या वर्षी तिच्यावर मातृत्व लादलं गेलं….. तिला झालेला मुलगा काही दिवसांतच मेला.....

भूतकाळाच ओझं माथ्यावर घेऊन चालताना तिच्यापुढे तीनच मार्ग होते….. आत्महत्या करणं... लाजिरवाण जीण जगणं.... किंवा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेणं….. ऑप्रा विन्फ्रेने तिसरा पर्याय निवडला, आणि नैराश्याने ग्रासलेल्या जगातल्या लाखो स्त्री पुरुषांना तिने जगायची एक नवीन उमेद दिली…. 

गरिबीला धोबी पछाड घालणाऱ्या ऑप्राने लागोपाठ २४ वर्ष " ऑप्रा विन्फ्रे टोक शो " सदर करून टेलीविजनच्या माध्यमातून तब्बल १४ हजार कोटी रुपये कमावले…. अन एक विश्वविक्रम केला... अर्धीअधिक संपत्ती तिने गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी खर्ची घातले….. ऑप्रा विन्फ्रेच्या त्या अफाट कर्तुत्वाला आणि श्रीमंतीतही माणुसकी जपणाऱ्या महान मानवतेला आपण सर्वानीच सलाम केला पाहिजे....

ऑप्रा विन्फ्रेने पाहिलेली गरिबी भयानक होती.... गोणपाट शिवून ती अंगावर फ्रॉक म्हणून वापरायची.... गरिबाला अब्रू नसते.... याचा अनुभव तिने वयाच्या ९ व्या वर्षीच घेतला. चुलत भाऊ, काका, त्यांचे मित्र सर्वानीच तिचा लैंगिक छळ केला..... १४ व्या वर्षी मुल झालं तेही दगावलं.... 

जगाचा इतका कटू अनुभव गाठीशी घेऊन जगणं कठीण होतं.... पण ती हिम्मत हारली नाही.... आयुष्यात जे काही करायचं ते उत्कृष्टच करायचं हा तिने ध्यास घेतला.... पुढची २० वर्ष तिला कठोर परिश्रम करावे लागले.... वयाच्या ३० व्या वर्षी टेलीविजन क्षेत्रात तिने प्रवेश केला.... पण ती काही एखाद्या टेलीविजन किंवा चित्रपटातील नायिकेप्रमाणे दिसायला सुंदर नव्हती..... ती सडपातळ, कमनीय बांधा असलेली किंवा नजरेत भरण्याइतकी दिमाखदारही नव्हती.... पण तिची इच्छा शक्ती जबरदस्त होती..... 

पुढली २४ वर्ष तिने अर्ध्या अमेरिकेला वेड लावलं होतं.... तीचा टोक शो पाहण्यासाठी झाडून सारी अमेरिका टी.वी.समोर बसू लागली ती..... पैशाच्या थैल्या घेऊन मोठ मोठी चानल्स तिच्या दाराशी उभी राहू लागली होती.... पैसा आणि श्रीमंती पायाशी लोळण घेऊ लागली.... तेव्हा भूत काळातल्या आठवणींनी ओप्रचा मन कासावीस व्हायचं....

गरिबीमुळे आपल्या नशिबी जे भोग आले ते इतर कुणाच्या वाटेला येऊ नयेत... म्हणून तिने गरिबांच्या संस्थांवर पैशाचा वर्षाव केला.... आज वार्षिक १२०० कोटी उत्पन्न असलेल्या ओप्राची कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी अशी आहे..... 

तिची हि कहाणी.... माझ्या असंख्य मित्रांना आयुष्यात कधीच खचू देणार नाही.... हा मला विश्वास आहे.... तुम्ही देखील आयुष्यात जे काही कराल ते उत्कृष्टच करायचा प्रयत्न करा.... त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा..... तुमची स्वप्नं नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचतील यात शंकाच नाही....

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास...... अपयशाने खचू नका.... अधिक जिद्दी व्हा..... संभ्रमाच्या वेळी नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या...... मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.....

आयुष्यात आपल्याला भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात...... तसेच आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही..... अशावेळी लक्षात ठेवा तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे....... परिस्थितीवर यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही...... ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये....

आताच्या परिस्थितीचे रुप बदलण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करा..... परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.... 

मित्रानो, ऑप्रा विन्फ्रे सारख्या माणसांनी हे जग भरलेले आहे..... म्हणनूच त्यांच्या कडून स्फूर्ती घेऊन सामान्य माणसे असामन्य होतात.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....



Wednesday 17 October 2012


आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप 'ब्रम्हचारिणी' 

          दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
                             देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।


नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे..... येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे..... ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी..... नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते..... या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते... या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते... या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.... 

तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो..... तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला... त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा.... यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती.... या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍रिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात..... 

एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली.... उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता..... या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले..... यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.... 

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते.... तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती..... तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी हाक दिली.... तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव पडले..... तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला..... सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले....

शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले.... की 'हे देवी...! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही.... तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे.... तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल.... भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील.... आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा.... लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.... असा वर त्यांनी दिला....

ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे.... तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.... देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.... अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे....

आदिशक्ती नमस्तुभ्यं......