Sunday 21 October 2012


आद्यशक्तीची विविध रूपे दर्शविणारा नवरात्र उत्सव.... 

आपली भारतीय संस्कृती फार पुरातन आहे..... आपले पूर्वज निसर्गप्रेमी, निसर्ग पूजक व मूर्तीपूजक होते.... मानवी जीवनात आराध्य दैवतांची आराधना उपासना याला फार महत्व आहे.... जगामध्ये अशी कोणतीही नैतिकमूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत.... तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते.... 

मानवी जीवनात स्थैर्य प्राप्त होण्यासाठी व आत्मिक बल वाढवून आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उपासनेची अत्यंत गरज आहे.... त्यादृष्टीने भारतीय सणात नवरात्र, घटस्थापना, दसरा हा एक महत्वाचा सण गणला जातो.... नवरात्र - दसरा हा एक शक्तीपूजा तसेच शक्तीची अनेक रुपे आणि महिमा दर्शविणारा सण आहे..... 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे.... महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आद्य देवांच्या पुष्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली.... या दैवी शक्तीने म्हणजेच जगदंबेने नऊ दिवस अविरत युध्द करून महिषासुराला मारले.... असुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिले.... ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा.... आपण या दिवसात आईजवळ शक्ती मागायची.... व आपल्यातील असुरी प्रवृत्तींवर विजय मिळवायचा.... 

नवरात्रीचे महत्व म्हणजे देवी शक्तीमाता त्रास देणार्‍या असुरांशी विविध रुपे धारण करून.... असुरी शक्तींशी अहोरात्र युध्द करून विजय प्राप्त करते.... म्हणजेच सर्वांच्या मुळाशी शक्तीच प्रेरक आहे..... म्हणूनच मूळ ओंकार तो ध्वनी.... तूज नाम ही भवानी... असे म्हंटले जाते.... देवीची विविध नांवे, रुपे, स्थाने व पीठे आहेत.... एकतत्वात विविधतत्व आहे.... जसे सोने हे एकच असेल तरी त्याच्यापासून विविध नक्षीचे आकाराचे दागिने तयार होतात... तसेच देवी आदिशक्तींची विविध रुपे व नावे आहेत.... 

साधकांसाठी नवरात्र म्हणजे उपासना करण्याचे नउ दिवस आहेत.... नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीचे तत्व..... इतर दिवसांच्या तुलनेत सार्वाधिक प्रमाणात कार्यरत असते त्याचा लाभ साधकांना साधनेत मिळतो....
  • महाकाली.... (शक्तिचे प्रतिक).... पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी देवीचे पूजन करायचे.... 
  • सत्वगुणी.... महालक्ष्मी (ऐश्वर्याचे प्रतिक)..... दुसरे तीन दिवस सत्वगुण वाढविण्यासाठी देवीचे पूजन करायाचे.... 
  • महासरस्वती.... (ज्ञानाचे प्रतिक)..... शेवटचे तीन दिवस साधना तीव्र करण्यासाठी देवीचे पूजन करायचे....

तसेच फक्त उपवास करायचा म्हणून नको.... उपवास म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे..... उपवास याचा अर्थ असा आहे.... उप म्हणजे जवळ जाणे.... वास करणे म्हणजे देवतांच्या सानिध्यात जाणे.... चला तर, घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भारून टाका.... तीव्र साधनेने देवीला प्रसन्न करुया.... 


ॐ श्री गुरुदेव दत्त ..... आदिशक्ती नमस्तुभ्यं.....

No comments:

Post a Comment