Saturday, 16 November 2013

चैतन्यधारा : गुरुभक्ती आणि गुरुकृपा

चैतन्यधारा : गुरुभक्ती आणि गुरुकृपा                                               (ता. १०-०१-२००८)

   "हनुमंत आमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे"

पहाटेच्या पवित्र वातावरणात समर्थ शिष्य कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते.. समर्थांना जाग येते.. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो.. 
"आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे कुलदैवत, तयावीण आमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे"

समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात..

सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो.. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते.. दातखिळी बसेल अशी थंडी पण शिष्य कल्याण तशा थंडीतही ब्रह्म्मुहुर्ती पहाटे ३ ला उठून, गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो.. 

समर्थ कुटीबाहेर येतात , कल्याणाकडे कौतुकाने पाहतात.. परमशिष्य कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते.. रातकिडे अजूनही ओरडत असतात , गार वारं सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत..

"श्रीराम जयराम जय जय राम"  समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात.. कल्याणाचे लक्ष जात, तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो..

महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात, काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला..!  तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो .. समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू..?

तो रामराया आहे ना..!!

ते काही नाही, आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे , कल्याणही मागे हटणारा नसतो.. समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते, थांबता थांबत नाही.. कल्याण घाबरतो.. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आत मध्ये परत झोपवतो, अंगावर भगवी शाल पांघरतो, आणि बाहेर येतो..

हळू हळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात .. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो , शिवाय शिवाजी राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसऱ्याचा मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते.. आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो..

गडाची डागडुजी, साफ सफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या  भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे.. सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात, तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये "कल्याण"  मात्र समर्थांचा फारच लाडका हि भावना मात्र कुठेतरी बोचायचीच..

शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा..! एक म्हणे मी दासबोधाची शत पारायणे केली आहेत, दुसरा त्यावर कुरघोडी करे, 'हा हा म्हणता माझी ५०० पारायणे या दास नवमीला पूर्ण होतील', तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून, आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा, "रामरायाने या देहाकडून ५ कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे”, मग इतर साधक यांच्याकडे आदराने वेग्रे बघायला लागायचे.. 

हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा, एक म्हणायचा, महाराज दयाळू आहेत, विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे , "श्रीराम श्रीराम"!!!

दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे, नुसता पुक्खे झोडतो चार वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही , कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही, अहो आपलं तर सोडा, समर्थांचे प्रवचन सुरु असताना, हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो हो, किती अपमान तो गुरूंचा नाही का..? अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या.. पण कल्याण समोर आला रे आला कि सर्वांची बोलती बंद..

त्याला सर्व काही कळायचे, आणि समर्थांना सुद्धा..  दोघांनाही फक्त मौज वाटायची..  कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबाबा फक्त समर्थांना जाणवायचा, त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत  पोहोचायचा.. 

ज्याने समर्थांसमोर बसून, त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरुपी आत्मरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला, ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला, जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय, अश्याला अजून पारायण करायची गरजच काय..? ज्याच्या श्वास श्वासातून रामनाम बाहेर पडतंय, तो किती जप मोजून ठेवणार..?  असो पण इतर सामान्य माणसांना या गुरु-शिष्याचं नात कधी कळलच नाही..!!

समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती , काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितल , कि कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे , त्याची परीक्षा घ्यायला हवी आता..!
शिष्यापेक्षा गुरूलाच शिष्याची जास्त काळजी.. लहान मुलाला माहित नसत , तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत, लिहून येतो, पण आईला केवढी चिंता, निकाल मिळे पर्यंत तिला काही चैन पडत नाही, तसंच होत इकडे, पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता.. 

आणि कल्याण..? तो या सगळ्यापासून अलिप्त होता, समर्थ हनुमत आणि राम, बास विषय संपला, त्याला वेगळं जगच नव्हत.. दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती, आणि सद्गुरूंच पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा कि चार जणांची काम पट्ट्या एकटा उरकायचा..

समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचे साठवलेलं पाणी चालायचं नाही..  म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे २ मोठे पितळी हंडे घेऊन, खाली "उरमोडी” नदी वर जायचा.. नदी काही जवळ नव्हती, जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांच अंतर होत.. पण कल्याण ते काम आनंदाने करायचा, तर सांगायची गोष्ट अशी कि आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता..

सकाळी ७ च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो, सहा फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे , संपूर्ण पांढरे केस, आणि अति तेजस्वी चेहरा, आल्या आल्या सरळ हा राममंदिरात जाऊन ठाण मांडतो.. 

समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात.. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात, आणि आपापल्या कामाला लागतात.. नऊच्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावण जात.. समर्थ कल्याणाला सांगतात, "अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायेत त्यांनाही बोलाव बरं का..

समर्थांच्या आदेशानुसार कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो, आणि म्हणतो.. "महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का ?"

वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो , मी फक्त पाणी घेतो, मला २ मोठे हंडे भरून पाणी आण.. आणि हो मला हे विहीरीच पाणी चालत नाही, मी फक्त नदीचच पाणी घेतो.. कल्याण विचारात पडतो, ते बघून वृद्ध खेकसतो, पाणी नसेल तर नको,  मी राहीन उपाशी,  झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज मी आलोच..

सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले २-३ तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो.. समर्थ ध्यानस्थ झालेले असतात.. उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो.. वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो.. आणि म्हणतो मला थोड्यावेळाने अजून लागेल.. 

कल्याण म्हणतो, काळजी नसावी मी आणतो भरून महाराज.. समर्थांना पण अजून पाणी लागेल, म्हणून हा तसंच तडक न्याहारी न करता, गड उतरायला लागतो.. मुखात रामनाम सुरूच असतं, नदीवर हंडे भरतो.. आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळ जवळ धावतच हा परत गडावर येतो.. 

जवळपास ११ वाजलेले असतात, वृद्ध ते हि पाणी तत्काळ संपवतो.. आता गडावरचे सगळेच चाट पडतात, हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, हे सर्वांना जाणवत.. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे पाणी आहे का..? आता कल्याण यायच्या आत गडावरचे २-३ सेवेकरी धावतात, महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची.. 

तर वृद्ध त्याच्याच अंगावर खेकसतो तुला सांगितलाय का..?  हा आहे ना (कल्याणाकडे बघून) एवढा खाऊन माजलाय, काय झाल याला..? आणि तुला जमत नसेल, तर सांग मी चालला जातो.. हे ऐकून कल्याण गडबड्तोच, वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल.. शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश, परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल..? तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा, मी लगेचच निघतो,  तुम्ही चिंता करू नका..

बिचारा परत दोन हंडे घेऊन, गड उतरायला लागतो, ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते.. अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात.. सर्वांग घामाने भिजून जातं, पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच, हि भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते कि जे करतोय ते रामरायासाठी बास, मनात दुसरा विचारच नाही, विकल्पच नाही..

कल्याण गडावर कसाबसा येतो, जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते .. कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात.. कितीही असूया असली तरी प्रत्येकाला त्याची दया येते.. वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो..

गडा वरील इतर शिष्य आल्या आल्या कल्याणाला हाक मारून जेवायलाच बसवतात.. ३ वाजून गेलेले असतात.. कल्याण अन्नाला नमस्कार करतो, रामाचे नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार, तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते, " पाणी !!!!!!! "

कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो.. समर्थांसाठी आलेल पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं, मी आलोच..

आता दोनच्या जागी ३ हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते.. इतर भक्त चुळबुळायला लागतात, समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळ पासून ध्यानात, कुटीचं दार बंद , करायचं काय..!!

कल्याण परत खाली येतो.. आता वेग फारच मंदावलेला असतो..  पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं कारण, समर्थांसाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असत.. आता आपल्या गुरूंना तहान लागली तर, डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं फार मोठ असत, काहीही करून समर्थांच ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवाच, माझी गुरु माउली तहानलेली राहता कामा नये.. किती ते गुरुप्रेम.. .... धन्य ते समर्थ , धन्य तो कल्याण !!!

डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो.. दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थिती शक्य तेवढ्या वेगाने वर येतो.. पण वेळ तर लागतोच.. उन्ह कललेली असतात.. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते, हृदय प्रचंड वेगाने धड धडत असतं, पावल लटपटत असतात.. इथे वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो.. संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते.. सर्व मंदिरात जमतात..

पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांच लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेल असतं.. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो.. माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झाले, कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो , दोघ तिघ पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो..

गड उतरायला सुरुवात होते, आणि काय आश्चर्य, शरीर पिसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडतं, कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीच पात्र दिसायला लागतं, हा घाबरतो.. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो.. 

कल्याण विचारतो आपण खाली कधी आणि का उतरलात, माझ्या हातून काही चूक घडली का..?

वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो, क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात..

"अणुपासोनी ब्रह्मांडा, एवढा होत जातसे" त्याचं प्रचंड रूप बघून, कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात.. तो मारुतीरायाच्या पायावर लोटांगण घालतो.. 

हनुमंत म्हणतात, 'बाळा तुझ्या भक्तीने आणि सद्गुरू प्रेमाने मी प्रसन्न झालो.. अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा, आज तू पूर्ण झालास'..  आणि पुढे काही कळायच्या आत, तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो.. 

कल्याण डोळे उघडतो, बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात.. आरती सुरु झालेली असते, हा धावत आत शिरतो.. कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात , देवळातही नसतात .. हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो, लांबवर 'धाब्याच्या मारुती' शेजारी, एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात.. 

समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो.. सारं आकाश लालेलाल झालेलं असतं, उरमोडीच खोर, केशरी रंगाने चमचमत असत.. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं.. कल्याण त्यांना लोटांगण घालतो, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात..

काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते.. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात, मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका काव्य पुष्पाची भर पडते..

" नसे गर्व आंगी सदा वीतरागी*
क्षमा शांती भोगी दयादक्ष* योगी
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा
इंही लक्षणी जाणिजे योगिराणा"
।।जय जय रघुवीर समर्थ।।
ॐ श्री गुरुदेव दत्त...

















स्वप्न आणि वास्तव                                                    (ता. १२-०२-२००७)  




       स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करणे यासाठी एक ठराविक वय असते, असा विचार करणाऱ्या मित्रांनी त्यांच्या मनातील हा गैरसमज पहिला दूर करावा.... कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे वय महत्वाचे नाही, तर त्यासाठी तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमची महत्त्वाकांक्षा, तुमच्यातील जिद्द महत्त्वाची.... आलेल्या अपयशाला कारणीभूत दोष-दुर्गुणांना तुम्ही आत्मपरीक्षणाने स्वःतामध्ये किती लवकर बदल घडवून घालवता त्यावर तुमचे यशापयश अवलंबून असते.....

        उंच भरारीची अपेक्षा करणारी लोक भरपूर असतील.... पण जो खरच मनापासून अन् आत्मविश्वासाने त्या दिशेने जायचे ठरवतो..... त्याला त्यासाठी वेळ काढणे अशक्य नसते.... अन् अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणारी लोक यशस्वी तर होताच आणि हजारो लाखो लोकांसमोर एक उदाहरण, एक आदर्श बनून राहतात..... त्यामुळे सकारात्मक विचारांनी जीवनाची वाटचाल सुखद अन् आनंदीच होते.... यात शंकाच नाही.... मनुष्य जन्म किती मिळतात.... हे मला माहिती नाही.... पण हा जन्म मिळाला आहे तर तो योग्यरित्या मार्गी कसा लावणे, हे आपले आपल्यावरच अवलंबून असते....
ॐ श्री गुरुदेव दत्त....



अनुभूती-स्वरूप : चिंतामणी (२२/१०/२०१३)

स्वामी शंकरानंद  यांचेबरोबर चौके येथील सहवासात एके दिवशी स्वामीजी म्हणाले.. चेतन, आपण खूप साधकांबरोबर मज हृदयी सद्गुरू हा संवाद केला, पण खरोखरच  साधकाच्या हृदयी सद्गुरू आहे का..? तशी जाणीव साधकाला होते का..? स्वरूपानंद स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्या ठराविक क्रमाने  संकलित केल्यात, ‘मज हृदयीं सद्गुरूनंतरया उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत।हि ओवी का असावी..? यावर थोडे चिंतन-मनन करावे.. बोलू मग पुढे..!

असा स्वामींचा आदेश आल्यावर यावर गुरुकृपेने चिंतनात्मक मनन-बोध संकलन झाले.. ते गुरुकृपाज्ञेने अनुभूतीपुर्वक संपादित लिखाण आपणा सर्वाना देत आहे..

पूजनीय स्वामीजींनी जी काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्यातील हा अतिशय छोटेखानी ग्रंथ - ज्ञानेश्वरीतील निवडक १०९ ओव्या असलेला - "ज्ञानेश्वरी नित्यपाठ"..  केवळ १५-२० मिनिटात या ओव्या वाचून होतील इतका हा सुटसुटीत ग्रंथ.. मात्र अर्थाकडे चिंतनात्मक ध्यान देऊन शांतपणे या ओव्या वाचत गेल्यास यातील गूढ भावार्थ आपल्या नित्याच्या जीवनालाही जागृती प्रदान करणारा असा एक समर्थ ग्रंथ आहे..

नाथ संप्रदायातील स्वामीजी इतर सिद्ध सत्पुरुष - सर्वांनाच ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ.. नाथ संप्रदायातील सगळेच महापुरुष ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच जीवनात उतरवणारे - त्यातील भक्तलक्षणे असोत वा गुणातीताची लक्षणे असोत वा स्थितप्रज्ञ लक्षणे असोत - ही सारी जीवनात कशी उतरवता येतील याचा सार्या आयुष्यभर पाठपुरावा करणारे..!

स्वामी स्वरूपानंद यांना माऊलींची सारी ग्रंथसंपदा म्हणजे जीव की प्राण.. माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रचलित मराठी रूप  "अभंग ज्ञानेश्वरी" जर पाहिली तर  सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्वरी कळायला कठीण म्हणून या ग्रंथाची रचना स्वामीजींनी केलेली आहे हे लक्षात येईल..  माऊलींच्या काळातली मराठी भाषा आपल्या पचनी पडणे अवघड म्हणून सध्याच्या (प्रचलित) मराठी भाषेत ही अभंग ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे..

मात्र असे असताना मूळ ज्ञानेश्वरीची गोडी, तिचे महत्व स्वामीजी पूर्ण जाणून होते.. मात्र मूळ ज्ञानेश्वरी खूप मोठी  (एकूण सुमारे ९३०० ओव्या) असल्याने त्यातील काही निवडक साररुप ओव्या जर दररोज वाचनात आल्या तर ज्ञानेश्वरी भाविकांना आणि साधकांना त्याचा खूप उपयोग होईल हे लक्षात घेऊन स्वामीजींनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे..

आपण जर या ग्रंथाचा नीट अभ्यास केला तर असे लक्षात येईल की या ओव्या निवडण्यामागे स्वामीजींचे काही स्पष्ट सूत्रात्मक योजन  आहे - एक साधकासाठी अनुकूल विचारधारा आहे.. तसेच ज्याला प्रॅक्टिकल परमार्थ म्हणता येईल तो यात सांगितला आहे..

आता स्वामीजींना अभिप्रेत असलेली यामागची विचारधारा समजावून घ्यायचा प्रयत्न करुयात.. यात कर्मयोग प्रामुख्याने अधोरेखीत केला आहे.. कर्माचे महत्व, कर्मयोग त्यातील साधकाचे उपयोगाच्या ओव्या निवडून काढणे, याकरता ज्ञानेश्वरीचा साक्षात मर्मज्ञच इथे उपस्थित असल्याचे आपल्याला जाणवते..

संसारी साधकासाठी योग्य कर्माच्या भक्कम पायावरच परमार्थाची (किंबहुना जीवनाचीही) इमारत उभी रहाते असे स्वामींजीचे ठाम मत यात दिसून येते.. मात्र हे कर्म कुठले, ते करता करता या कर्मपाशातून अलगद सुटका कशी करुन घ्यायची हे सारे त्यांनी नित्यापाठातील संकलित  ओव्यांद्वारे सुरेख समजावले आहे..

स्वामीजींना अभिप्रेत साधक हा संसारात असूनही  साधनेसाठी तत्पर आहे..  म्हणूनच मन भगवच्चरणी ठेवण्यासाठी काय करावे याचेही मार्गदर्शन ते करतात.. त्याकरता आधी अभ्यासाने मन आवरणे - मग चोवीस तासातले निदान क्षण दोन क्षण परमात्म्याच्या चरणी मन, चित्त ठेवण्याचा प्रयत्न करीत करीत पुढे ते सारे मन, चित्त भगवच्चरणी वहाणे (संपूर्ण समर्पण) - अशा या भक्तिची परिपूर्ती - भगवद्रूपास प्राप्त होणे हे सर्व या ओव्यातून स्पष्ट झालेले आढळते..     या  ग्रंथाचा अभ्यास करताना जाणवते सद्गुरू किती कृपाळूपणे आपल्या सर्व भक्तांकडे पाहतो.. 

ग्रंथाचे प्रयोजन काय..? तर परमार्थ हा नुसता ग्रंथात सांगितलेला नसून तो रोजच्या आचरणात कसा आणता येईल याचे मार्गदर्शन स्वामीजींनी अतिशय कनवाळूपणे या ग्रंथातून केले आहे .. आज संसाराने गांजलेल्या भ्रांतीने उद्विग्न  साधकांना ज्ञानेश्वरीचे काही घास भरवण्याचा प्रयत्नच जणू.. संसारी खेळामध्ये रमलेल्या साधकाच्या  पोटात चार घास जावेत एवढाच माफक हेतू आणि साधकाने अभ्यास केला तर जागृती हि ठरलेली..

*** सर्वसामान्य माणसावर भौतिकाचा प्रभाव मोठा असतोच.. भौतिक संपन्नतेला त्याच्या लेखी सर्वाधिक महत्त्व असतं.. साधकाला आत्मिक उन्नतीची ओढ लागलेली असते, पण त्याच्यावरचा भौतिकाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसतो.. भौतिकात किंचितही कमी-अधिक झालं तरी आपल्या वृत्तीत पालट होतो., या जाणिवेनंही तो व्यथित असतो, पण त्यावर उपाय काय, हे त्याला उमगत नसतं..

स्वामी शंकरानंद यांनी  ‘मज हृदयीं सद्गुरूनंतरया उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत।हि ओवी का असावी..? यावर आता आपण चिंतनात्मक मननाने पाहू..!!

साधकाच्या वतीने श्री आणि शारदा या दोन्ही शक्तिरूपांना नमन करून या द्वैताच्या महापुरातून वाट काढण्याचा, तरून जाण्याचा एकमेव उपाय कोणता, हे स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी नित्यपाठातील पुढील चौथ्या ओवीतून सांगतात. ती ओवी अशी :

मज हृदयीं सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपूरू। म्हणौनि विशेषें अत्यादरू। विवेकावरी।।४।। (/२२)
थोडक्यात..  ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले, ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे..
साधनेच्या सुरुवातीला आपली स्थिती कशी असते, ते आपण जाणत आहोत.. ही स्थिती मज हृदयी सद्गुरूया जाणिवेसह नसते.. उलट मीआणि माझेनं भारलेली असते.. थोडक्यात मज हृदयी अहंभारू अशी ही स्थिती असते..! आध्यात्मिक भावयात्रेत हृदयया शब्दाचा अर्थ आहे अंत:करण..   मीआणि माझेचं ओझं आपण हृदयात अर्थात अंत:करणात जन्मापासून बाळगत असतो.. आपल्या मनातले सर्व विचार, कल्पना, आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया या त्या अहंभावनेतूनच होत असतात.

श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, मला तुमच्या हृदयात यायला तुम्ही जागाच ठेवलेली नाही.. अर्थात आपल्या हृदयात विकार आणि वासनायुक्त इच्छांची इतकी गर्दी आहे की तिथे सद्गुरूंना स्थानापन्न व्हायला आपण जागाच ठेवलेली नाही.. श्रीसद्गुरू हे आधीच हृदयात स्थानापन्न असताना त्यांना तिथं वेगळं स्थानापन्न करायचं ते काय, अशी शंका साधकाला येते..

आपल्या हृदयात सद्गुरू आहेतच, हे खरं पण आपल्याला त्यांची जाणीव आहे का..? ते तिथे असूनही ती जाणीव नाही आणि म्हणून आपण दुनियादारीमागे फरपटत जातो.. आपण किती सहज म्हणतो की परमेश्वर सद्गुरू हे सर्वज्ञ आहेत, सर्वत्र आहेत.. श्रीगोंदवलेकर महाराज यावर म्हणाले की, मी तुम्हाला क्षणोक्षणी पाहातो, असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुमच्याकडून पाप घडणारच नाही.. आपल्याकडून चुका घडत नाहीत का..? अहंकारानं आपण दुसऱ्याशी वागू नये तसं वागत नाही का..? स्वार्थापायी दुसऱ्याला अकारण दुखावत नाही का..?

तारिलों हा संसारपूरू।   संसाराचा पूर आहे.. संसार म्हणजे क्षणोक्षणी बदलणारा.. जे जन्माला येतं, त्याला अंत आहे.. जे आकारात येतं त्याला वाढ, घट, झीज आणि नाश अटळ आहे.. परिस्थिती बदलत राहाते आणि त्या परिस्थितीच्या प्रभावात कैद असणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रियाही बदलतात.. त्यामुळेच आयुष्यात परिस्थिती एकसारखी राहात नाही तशीच माणसांची वर्तणूकही एकसारखी राहात नाही.. माणसाला या बदलाची भीती वाटते! आपण स्वत: कालानुरूप, परिस्थितीनुरूप, वयानुरूप बदलत जातो, ते आपल्याला स्वाभाविक वाटतं, पण दुसऱ्या माणसांच्यातला बदल आणि तोही आपल्याला प्रतिकूल असेल तर, आपल्याला सहन होत नाही..

तेव्हा माणूस संसाराच्या या सततच्या बदलत्या स्वरूपाला घाबरतो.. जगणं कायमचं सुखाचं असावं, अशी त्याला एकमात्र आस असते.. सुखाची त्याची व्याख्या मात्र दु:खालाच धरून असते.. दु:खाचा अभाव म्हणजेच सुख असं तो मानत असतो.. जीवन मात्र एखाद्या महापुराच्या वेगानं वाहात आहे.. संत यालाच भवसागर म्हणतात..

भव म्हणजे इच्छा. अमुक व्हावं’, ‘अमुक होऊ नये’, या इच्छेच्या दोन वर्गवारीतच माणसाच्या समस्त इच्छांचा पसारा विभागला गेला असतो. या इच्छांच्या पकडीतून माणूस कधीच मुक्त होत नाही. अर्थात संसाराच्या या महापुरातून तरून जात नाही.. हे तरणं किंवा भवसागर पार होणं त्यालाच साधेल जो हवं-नकोपणाच्या इच्छेच्या प्रभावातून मुक्त होऊ शकेल.. हे साधणं काय सोपं आहे..? निश्चितच नाही... ते साधायचं तर या इच्छांचा उगम जिथे असतो, या इच्छांची मुळं जिथं पसरली असतात त्या हृदयातच श्रीसद्गुरूंनाच स्थानापन्न करावं लागेल..!

तेव्हा माझ्या हृदयात सद्गुरू आहेतच, हा भाव असेल तर माझं जगणं संकुचित राहूच शकणार नाही.. ते संकुचित असेल तर माझं अंत:करण सद्गुरूभावानं नव्हे तर अहंभावानंच व्यापलं आहे, यात शंका नाही.. तेव्हा सद्गुरूंना हृदयात स्थानापन्न करणं म्हणजे त्यांच्या तेथील स्थानाची जाणीव सतेज ठेवणं. जगणं त्यांच्या अनुसंधानात व्यतीत होणं. तर आता श्रीसद्गुरू हृदयात स्थानापन्न होणं (मज हृदयी सद्गुरू) या पहिल्या टप्प्याचा परत विचार करू..

अभ्यासानं हा टप्पा साधण्याचा प्रयत्न करावाच लागतो.. अभ्यास जसा आणि जितक्या तळमळीनं, सातत्यानं होईल तसतसे सद्गुरू माझ्या अंतरंगात कसे आहेत, हे जाणवू लागेल.. आता अभ्यासाची गरज काय..? ज्यांना खऱ्या सद्गुरूंच्या सहवासाची संधी लाभली आहे, त्यांनाही हा अनुभव असेल की सद्गुरूंच्या सहवासात असताना मन जणू एका वेगळ्याच, उच्च पातळीवर असतं.. तो सहवास थोडा दुरावताच भौतिकाची जाणीव जागी होते आणि लगेच मनावर कब्जा घेऊ लागते.. जे कळकळीनं  साधना करीत आहेत, त्यांनाही जाणवेल की, साधनेत मन ज्या उंचीवर असतं ते साधना आटोपताच, एकदम खाली घसरतं.. साधनेत एखाद्या अवचित क्षणी मन अत्यंत अंतर्मुख होतं, एका वेगळ्याच प्रसन्नतेनं भरून जातं, शब्दांत सांगता येणार नाही अशा दिव्यत्वाच्या जाणिवेनंही व्यापून जातं.. ती स्थिती टिकत मात्र नाही की मनात येईल तेव्हा त्या स्थितीचा अनुभव पुन्हा घेता येईलच, असा दावाही करता येत नाही..!

अनुग्रह गुरुकृपेने मिळाला कि साधकाला वाटते झालो मी पावन.. सुरुवातीला काही दिवस मन साधनपथावर लागलं तरी पुढे काहीवेळा साधना एक कर्तव्य म्हणून पार पडत असते.. त्यात कृत्रिमता असते.. खरी ओढ असतेच, असं नाही.. खरी ओढ दुनियेकडेच असते.. साधना तरीही जर चिकाटीनं होऊ लागली तर अवचित एखाद्या क्षणी मनाला शब्दांत सांगता येणार नाही अशा प्रसन्नतेचा अनुभव येतो.. तो झटकन ओसरतो, पण तरी त्या क्षणाचा प्रभाव फार मोठा असतो. जीवन म्हणजेच साधना, ही स्थिती नसतानाच्या काळात कर्तव्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या साधनेतही मनाला फार थोडा काळ का होईना ज्या मानसिक स्थैर्याचा, मानसिक शांतीचा, निर्भयतेचा अनुभव येतो, तो ती साधना संपून मन भौतिक व्यवहारात येताच ओसरतो..

मन पुन्हा अस्थिरतेच्या, अशांतीच्या, भयाच्या अनुभवानं हिंदकळू लागतं. तेव्हा या प्राथमिक पातळीवर मन साधनेत एकाग्र करणं, जीवन सद्गुरूंच्या अनुसंधानात व्यतीत व्हावं, यासाठी त्या अनुसंधानाचा अभ्यास करणं या झटापटीत व्यग्र असतं.. समर्थानीही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावीया शब्दांत या प्रक्रियेचं ध्येय डोळ्यापुढे ठेवायला सांगितलं आहे. थोडक्यात आज आपल्याला देहभान आहे. त्या जागी आत्मभान जागं करायचं आहे.. त्या आत्मभानाची स्थिती कायमची राखायची आहे.. ते साधलं तरच म्हणौनि विशेषें अत्यादरू विवेकावरी, हा टप्पा गाठला जाईल..

आज देहभान असल्याने जगणं देहबुद्धीच्या आवडीनुसार व्यतीत होत आहे.. देहबुद्धीला जे प्रेय आहे तेच आवडतं.. जे प्रेय आहे, माझ्या आवडीचं आहे ते श्रेय असेलच असं नाही, माझ्या हिताचं असेलच असं नाही. जे खऱ्या अर्थानं माझ्या हिताचं आहे त्याचा स्वीकार आणि जे खऱ्या अर्थानं माझ्या अहिताचं आहे त्याचा त्याग, हाच खरा विवेक आहे..

जीवनात सार काय, शाश्वत काय आणि असार काय, अशाश्वत काय हे ओळखता येणं आणि ते ओळखल्यावर जे सार आहे, शाश्वत आहे ते स्वीकारून जे असार आहे, अशाश्वत आहे ते मनातून त्यागता येणं, हाच खरा विवेक आहे.. आज हा विवेक नाही म्हणूनच आपल्या जगण्यात अविवेकापायी विसंगती, विरोधाभास आहे. जीवनात शाश्वत काय आहे, सार काय आहे, योग्य काय आहे, स्वीकारार्ह काय आहे, त्याग करण्यासारखं काय आहे, हे केवळ सद्गुरूंच्याच बोधातून जाणता येतं.. त्यांच्या कृपाछायेतच जे योग्य आहे, स्वीकारार्ह आहे ते जीवनात बाणवण्याचा अभ्यास करता येतो.. त्यासाठी वारंवार त्यांच्याच बोधाचं स्मरण मनात घोळवावं लागतं.. वारंवार त्यांच्या सहवासाचा अनुभव घ्यावा लागतो किंवा त्यांच्या व्यापक चरित्रातील स्मृती  प्रसंगांचा आधार मनाला द्यावा लागतो..

****जे आपल्या खरं हिताचं नाही ते हिताचं वाटतं आणि त्याच्या प्राप्तीसाठीच आपण तळमळत राहतो, हेच जीवनातील दु:खाचं खरं मूळ आहे.. जे अहिताचं आहे, तेच आवडतं आणि जे खऱ्या हिताचं आहे त्याची तीव्र नावड मनात असते, हेच दु:खाचं कारण आहे. तेव्हा माझ्या हिताचं काय आहे आणि माझ्या अहिताचं काय आहे, याची जाणच मला नसते..

हित-अहित  काय हि जाण श्रीसद्गुरूंमुळे येते.. अर्थात नुसत्या ऐकीव शब्दांनी ज्ञान होत नाही.. आचरणात आणून त्याची प्रचीती आल्याशिवाय त्याची सत्यता पटत नाही आणि ती कला सद्गुरूंशिवाय कुणीच शिकवू शकत नाही.. ते आपल्या जीवनात प्रथम तसं आचरण करून दाखवतात.. प्रतिकूल परिस्थितीतही गुरूच्या आधारावर मनाची स्थिरता कशी टिकवता येते, हे आपल्याच जीवनातून ते प्रथम दाखवतात.. संतांच्या जीवनातही किती कष्ट होते, किती अपमान आणि यातना होत्या. तरीही भगवंताचा आधार त्यांनी कधी सोडला नाही..

थोडी अडचण येऊ द्या, आपला विश्वास डगमगतो.. तेव्हा हा आंतरिक विश्वास टिकावण्याची कला त्यांच्याच जीवनातून जाणता येते.. पोहायला शिकणाऱ्या मुलाला पाण्यात पहिली उडी टाकताना भीती वाटत असते आणि पट्टीचा पोहोणारा सांगतो, ‘‘अरे तू उडी टाक, मी आहे. तू बुडणार नाहीस.’’ तेव्हा भीतीसकट तो उडी घेतो आणि मग दुसऱ्या खेपेस उडी मारताना भीती कमी झाली असते..

स्वामीजी म्हणतात, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवून पहिलं पाऊल तरी टाका, मग पुढची पावलं तुम्ही आत्मविश्वासानं टाकू शकाल!’’  पाण्यात पहिली उडी मारताना मनात जशी भीती असते तशीच भीती या संसारात सद्गुरूंच्या सांगण्यानुसार जगायला सुरुवात करताना असते.. तसं जगण्याच्या पहिल्या पावलात भय असतं, अनिश्चितता असते, साशंकता असते.. ते पाऊल टाकलं गेलं की मग पुढचं पाऊल टाकण्याचं बळ मनात एकवटू शकतं.. त्यासाठी आधी, सद्गुरूंच्या सांगण्यानुसार मला जगायचं आहे, ही भावना व्हावी लागते.. हृदयामध्ये संसाराच्या प्रेमाऐवजी सद्गुरूंचं प्रेम उत्पन्न व्हावं लागतं.. लहानशी ठिणगी पाहता पाहता कचऱ्याचा ढीग जाळून टाकते.. तशी सद्गुरूप्रेमाची लहानशी ठिणगी जरी उत्पन्न झाली तरी ती अंतरंगातला पसारा वेगानं नष्ट करू शकते..

त्यासाठी मज हृदयी सद्गुरूही जाणीव सतेज व्हावी लागते.. तसं झालं की विवेकाचा खरा अर्थ उकलेल.. आपलं जगणं विवेकानुसार आहे की नाही, याची समज वाढेल.. विवेकपूर्ण जगणं लगेच साधू लागेल, असं नाही.. त्यासाठीच्या अभ्यासासाठी निदान मन अनुकूल तरी होईल..

विवेकापाठोपाठ वैराग्य येईल.. वैराग्यानं खरा भाव आणि खरी भक्ती उमलेल.. विवेक, विरक्ती, भाव-भक्तीच्या अभावानं असलेलं जीवन किती रखरखीत असतं, त्याची जाण येईल.. स्वामी स्वरूपानंद सांगतात, ‘‘अंतरीं विरक्ति नाहीं भाव-भक्ति। तयां अधोगति चुके चि ना।। लोळती शेणांत सुखें शेणकिडे। तैसे ते बापुडे प्रपंचात।। गुंतुनियां देहीं बुडाल संदेहीं। अंतीं तयां नाहीं समाधान।।

आपल्या हृदयात श्रीसद्गुरूला धारण केलं तरच विवेक जागा होतो. ज्ञानेश्वरी माउलींनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘‘आतां हृदय हें आपुलें। चौफाळूनिया भलें। वरी बैसऊं पाउलें। श्रीगुरूंची।।’’ (अध्याय १५/ ओवी ).

हृदय म्हणजे अंत:करण. अंत:करण म्हणजे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार.. तेव्हा या चार पायांच्या चौरंगावर श्रीगुरुंची पावलं धारण करू, असं माउली सांगतात.. तेव्हा हृदयाचा चौरंग करून त्यावर सद्गुरूच्या पादुकांची स्थापना करण्याचा हेतूच जीवन त्यांच्या बोधानुरूप जगता यावं, हा आहे.. अंतरंगात विवेक निर्माण व्हावा आणि जगण्यातही तो उतरावा, हा आहे.. योग्य निर्णयशक्ती म्हणजेच विवेक’, अशी विवेकाची व्याख्या स्वामी स्वरूपानंद  यांनी केली आहे.

साधकापुरतं बोलायचं तर जगण्याच्या हेतूबद्दलचा त्याचा निर्णय, जगण्याच्या रीतीबद्दलचा त्याचा निर्णय, जीवनात  काय  आणि  कसं साधायचं, याबाबतचा त्याचा निर्णय, हेच निर्णय साधकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात.. ते त्याच्या वर्तमानावर आणि त्यायोगे भविष्यावरही परिणाम घडविणारे असतात.. साधक हा वृत्ती घडविण्याचा अभ्यास करीत असतो. त्यात कधी चुकते, कधी बरोबर होते.. मधेच मन ईश्वरभावनेनं व्याकुळ होतं तर तितक्याच वेगानं भौतिकाच्या भावनेनंही व्याकुळ होतं.. नात्यागोत्यातल्या माणसांच्या वर्तणुकीने कधी मन संसाराबद्दल एकदम विरक्त होतं तर पुढच्याच क्षणी त्याच नात्यागोत्यांत लिप्त होतं..

स्वामीजी म्हणतात की, ‘‘कितीही झाले तरी साधक अविद्येतच असतो. त्यामुळे मुमुक्षेबरोबरच, मोक्षाच्या इच्छेबरोबरच सुप्तभावाने बुभुक्षा म्हणजे भोगाची इच्छाही त्याच्या चित्तात असण्याची संभावना असते. आता ही भोगेच्छा कदाचित स्थूल स्वरूपाची नसेल, साधकाला कदाचित तिची तितकीशी जाणीवही नसेल, परंतु ती सूक्ष्म स्वरूपाची, त्याच्या नेणिवेत लपलेली असणे शक्य आहे आणि जोवर साधकाची आत्मप्राप्तीची (आत्मसाक्षात्काराची) इच्छा अशा स्थूल वा सूक्ष्म भोगेच्छेशी मिसळली असते तोवर आत्मलाभासाठी बावनकशी तळमळ, सोळा आणे प्रामाणिक आंतरिक ओढ, खरीखरी व्याकुळता वाटू लागणे कदापि शक्य नाही..

ज्यावेळी अंत:करणातील सर्व तऱ्हेची भोगेच्छा हतबल, हतप्रभ होते त्या वेळी मग मनाच्या वृत्ती लय पावतात.. मग मन शांत, स्थिर होऊन शुद्ध, पारदर्शक होते.’’ तेव्हा सद्गुरूंचा बोध आणि त्यांचा संग हा साधकाच्या अंतरंगातील इच्छांचा पसारा कमी करू लागतो.. जे श्रेय आहे, नित्य आहे त्याच्या प्राप्तीसाठी आवश्यक विवेक जागा करू लागतो. हे स्वबळावर शक्य नाही..

त्यासाठी माउलीही सांगतात, म्हणोनि जाणतेनि गुरु भजिजे। तेणें कृतकार्य होइजे।। जैसें मूळसिंचनें सहजे। शाखापल्लव संतोषती।।’’ (ज्ञानेश्वरी, . / ओवी २५).

ही विराट सृष्टी म्हणजे जणू विराट वृक्षच आहे. प्रत्येकाचं जीवनही त्या विराट वृक्षासारखंच आहे. वृक्षाच्या फांद्या जशा अनेक दिशांना पसरल्या असतात, तसा जीवनाचा प्रवाह अनेक दिशांनी वाहत आहे. वृक्षाला फळं, फुलं लागतात तसेच आनंदाचे, सुखाचे क्षण या जीवनात उमलतात.. फळं, फुलं कोमेजावीत, पानं गळावीत, तसं याच सुखाच्या क्षणांच्या सरण्याचं दु:खंही याच जीवनात भोगावं लागतं.. हा विराट वृक्ष दिसतो, पण तो ज्यायोगे साकारला ती त्याची मुळं मात्र दिसत नाहीत.. ती जमिनीत घट्ट असतात..

ही सृष्टी ज्यानं उत्पन्न केली तो मूळ परमात्माही असाच अदृश्य आहे.. त्या मुळाला मी पाणी घातलं पाहिजे.. पाणी म्हणजे आंतरिक भाव.. पाणी जसं जिवाला जगवतं, तोषवतं, पोषवतं, त्याप्रमाणे हा आंतरिक भावच आंतरिक स्थितीचं पोषण करतो.. जीवाला स्वस्थ करतो.. जीव मात्र प्रत्येक पानाला पाणी देण्यासाठी धडपडावं, त्याप्रमाणे प्रत्येक नात्यागोत्यात हा आंतरिक भाव ओतून ती नाती आपल्या मनाजोगती राखण्याचा प्रयत्न करीत असतो.. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी आणि राहावी यासाठी आंतरिक भावानिशी धडपडत राहतो.. त्यापेक्षा मुळालाच पाणी घातलं तर..? तेव्हा हृदयात भरती-ओहोटीयुक्त प्रपंचाला घट्ट धरण्याऐवजी सदा एकरसात निमग्न सद्गुरूलाच धारण केलं तर विवेकाच्या लाभानं जीवनवृक्षही कृतार्थपणे बहरेल..

विराट वृक्ष आहे, तर मुळं असलीच पाहिजेत.. मुळं दिसत नाहीत म्हणजे ती नाहीत, असं कसं म्हणता येईल..? झाडानं विचार केला की, जर मुळातूनच मी आलो म्हणतात तर मग मला ती दिसलीच पाहिजेत, तर तेही कसं शक्य आहे..? पण मुळंच जर सुकली तर झाडही सुकेल.. जगणार नाही..

तसाच अदृश्य परमात्म्याचा आधार क्षीण होत सुटला तर जीवनही शुष्क होत जाईल.. अदृश्य परमात्म्याचा आधार कसा पकडता येतो, हे शिकविण्यासाठीच तर श्रीसद्गुरू आले आहेत..

सद्गुरू आज  मनुष्यरूपात समोर येतात म्हणून मी त्यांच्याशी मनुष्यभावानंच वागू लागतो.. मनुष्यमात्राचे गुण-दोष त्यांच्यावर थोपू लागतो..  सहवासानं हळूहळू त्यांचं विशेषत्व साधकांना समजू लागतं, पण त्यांची खरी ओळख काही साधकांना  झाली नसते..  त्यांची खरी ओळख  ज्यांना  परमतत्त्वाची जाण आहे, त्यांनाच  होते..  चराचरातही त्यांचंच त्यांना दर्शन होतं..  याच आशयाची स्वामी स्वरूपानंद संकलित ज्ञानेश्वरी नित्यपाठातली पुढली ओवी पाहू.. 

ही ओवी अशी- या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत। तें तत्त्वज्ञ संत। स्वीकारिती।।५।। (. / १२६)

साधकांसाठी वरील ओवीचा अर्थ : सद्गुरू विशिष्ट देह धारण करून माझ्या जीवनात आले आहेत.. देहबुद्धीच्या प्रभावानं जसं मी स्वत:ला देहच मानतो त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या देहालाच सद्गुरू मानतो.. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट आकारापुरत आणि विशिष्ट कारणापुरतंच मर्यादित करतो.. प्रत्यक्षात ज्या देहाच्या माध्यमातून, ज्या देहाच्या उपाधीद्वारे ते माझ्यासमोर प्रकटले आहेत त्या देहामध्ये सर्वव्यापी असं चैतन्यच भरून आहे.. त्याची ओळख मला नाही, पण परमतत्त्वाचं ज्ञान झालेले जे संत आहेत त्यांनाच सद्गुरूंच्या खऱ्या स्वरूपाची ओळख आहे. त्या चैतन्य स्वरूपाचाच ते स्वीकार करतात.

 मज हृदयी सद्गुरू नंतर स्वामी स्वरूपानंद यांनी ही ओवी योजल्यानं त्या ओवीशीच हिची जोडणी आहे. आधीच्या ओवीचा मथितार्थ काय होता..? तर, श्रीसद्गुरूंना मी हृदयात धारण केलं, सद्गुरूंनी माझं हृदय व्याप्त आहे, याची जाण मला आली.. त्यामुळे माझ्या जीवनात विवेक आला.. योग्य काय, अयोग्य काय, याची जाण आली.. एवढंच नव्हे तर केवळ सद्गुरूंनाच हृदयात स्थान असल्यानं, जे योग्य आहे, ते स्वीकारण्याचं आणि जे अयोग्य आहे ते नाकारण्याचं मानसिक बळही माझ्यात आलं..

मात्र  सद्गुरू देहाची उपाधी घेऊन माझ्यासमोर आले आहेत.. आकारात आले आहेत.. देहाचं पांघरूण घेऊन आले आहेत.. त्या उपाधीवरूनच मी त्यांना ओळखतो.. ते ठेंगणे-उंच आहेत, ते काळे-गोरे आहेत, ते अशक्त-धिप्पाड आहेत, ते अमुक तऱ्हेचं वस्त्र नेसतात, ते अमुक प्रकारचं गंध लावतात.. या सर्व उपाधींनाच मी त्यांची ओळख मानतो, त्यांचं स्वरूप मानतो..  सद्गुरू ज्या देहाच्या उपाधीत, ज्या देहाच्या माध्यमातून प्रकटले आहेत त्या उपाधीमध्ये खरं तर सर्वगत, सर्वव्यापी असं चैतन्यच भरून आहे.. परमतत्त्व जाणणारे संतच त्यांचं खरं स्वरूप जाणतात.. नुसतं जाणत नाहीत, तर त्याचा स्वीकारही करतात..!

श्रीसद्गुरूंचं खरं स्वरूप सर्वसामान्य साधक जाणू शकत नाही.. मनुष्यभावानंच तो सद्गुरूंकडे पाहतो आणि त्या भावानंच त्यांची सेवाही करतो.. भौतिकाच्या प्रभावात अडकलेल्या जिवाला त्यातून सोडवणं आणि कर्तव्यर्कम करीत असतानाही त्याचं चित्त परमात्मतत्त्वात रंगवणं, या त्यांच्या खऱ्या व्यापक कार्याची जाण त्याला नसते.. परमतत्त्वाची जाण आल्यानं त्या तत्त्वाशी एकरूप झालेले संतच त्यांचं खरं चैतन्य स्वरूप जाणतात. त्या स्वरूपाचा ते स्वीकारही करतात..

स्वीकार म्हणजे पूर्ण ग्रहण करणं, त्या स्वरूपाशी एकतानता, एकलयता साधणं.. त्या स्वरूपाची जाण ठेवून वाटचाल करणं.. भौतिक नश्वर आहे आणि त्या भौतिकातच ईश्वर तत्त्वामध्ये साधकाला विलीन करण्यासाठी सद्गुरूही प्रकटले आहेत.. तो ईश्वर जसा व्यापक आहे, त्याचप्रमाणे पहिल्या पायरीवरील साधकासाठी भौतिकाचा प्रभावही व्यापक आहे.. त्या प्रभावात अडकलेला साधक त्यातच अडकून भिरभिरण्याचीही भीती आहे..

मनुष्य जन्म मिळणं ही मोठी प्राप्ती. त्या जन्माचं ध्येय ठरवता येणं, ही आणखी मोठी प्राप्ती.. त्या ध्येयानुरूप जीवन जगता येणं, ही त्यापेक्षा मोठी गोष्ट.. तसं पाहता प्रत्येकाचं जीवनध्येय सदासुखी होणं, हेच असतं.. भौतिकाच्या सवयीमुळे आणि प्रभावामुळे आपण भौतिकालाच सुखाचा आधार मानून, तोच आधार मिळवणं, वाढवणं आणि टिकवणं, हेच आपलं ध्येय मानतो..

भौतिक हे काळाच्याच पकडीत असल्याने भरतीमागे ओहोटी आणि ओहोटीमागे भरती, या क्रमानेच भौतिक स्थितीतही भरती-ओहोटी होतच असते.. त्यामुळे भौतिकावर सर्वस्वी अवलंबून असणारी माझ्या मनाची स्थिरता सदोदित हिंदकळत असते..

अशा वेळी साधू-संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर उमगतं की त्यांच्या जीवनातही हा खेळ सुरू असतानाही त्यांचं मन स्थिरच राहिलं.. मग भौतिकाच्या प्रभावापलीकडे जाण्यातच खरं सुख आहे का, हा प्रश्नही मनात उत्पन्न होतो.. त्याचं उत्तर शोधण्याची खरी तळमळ लागली कि कळते.. परमतत्वाचा साक्षात प्रत्यय म्हणजे सदोदित त्याच्याशीच ऐक्य साधलेला सद्गुरू..!  एकदा ही जाण आली की मग त्या सद्गुरूच्याच भजनात दंग व्हायला माउली सांगतात..

सद्गुरूचं भजन म्हणजे काय..? कर्तव्यापुरतं आहे त्या संसारात राहून मन त्याच्याच चिंतनात राहणं, हेच खरं भजन आहे..! असं भजन साधलं तरच साधक कृतार्थ होईल..  सद्गुरु साधकाच्या हृदयात निवास करतील.. गुरूच्या कृपेचा विशेष प्रभाव म्हणजे मी जे करेन, जे जे विचार मनात उमटतील, त्या सर्वावर गुरूंचे सदैव लक्ष असेल म्हणून जीवनात नित्य विवेकाचे अनुसरण होईल..

स्वामी स्वरूपानंद सांगतात.. गुरु तत्व-साधना मार्ग-विचार याची पूर्ण ओळख-अभ्यास आदरपूर्वक नित्य आचरिला की सहजी सद्गुरू हृदयस्थ होतात..  पूर्ण श्रद्देने श्री गुरुचरणी आपले सर्वस्व अर्पण केल्यावर शिष्य पूर्णकामहोतो.. त्याचे मीपण गेल्यावर मागावे, असे कांहीच उरत नाही.. यासाठी कृतकार्यहोण्याला गुरुवचनी श्रद्धा ठेऊन आदेशानुसार आचरण करावे.. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां

श्री गुरुदेव दत्त... 



No comments:

Post a Comment