Monday 25 November 2013

जीवनाचा अर्थ उलगडणारे क्षण….


प्रत्यक्ष जगताना, भोगताना नकोसे वाटलेले, असह्य क्षण, एकदा आठवणींच्या कोशात बंद झालेकी नंतर आपल्याच आठवणीत कधी कधी आपण त्यांना कुरवाळतो.... असे क्षण जगताना जीव कासावीस होतो, काही काही नकोसे वाटते.... पण कालांतराने आपण त्या अवघड वाटेवरून चालून गेलो.... याचा आनंदही होतो, कारण आज त्याच्यापासून बरेच लांब आलो असतो आपण..!.. मग त्याची तीव्रता ही कमी होते.... आणि जर त्या असह्यतेवर विजय मिळवला असेल तर त्या वेदनेला कुरवाळतानाही बरे वाटते....
प्रथमता होणाऱ्या दु:खाची जाणीव जीवन अर्थहीन असल्याचा भास निर्माण करु शकते.... पण आलेल्या परिस्थिती मागे काही अर्थ आहे.... हे कळले की मग दु:खही सुसह्य होते.... दु:ख भोगताना त्या दु:खाची नवी ओळख असते, नंतर तीच ओळख जुनी झालेली वाटते.... तेव्हा वाटलेल्या मरणयातना, जरी त्यांनी मरण दिले नसेल तरी त्यामुळे असेल, त्याला पुरून उरलोय ही भावना.... क्वचित काही लोकांना याचा अहंकार सुद्धा होतो....
चालताना एखादी वाट चालून जातोही आपण, तेव्हा कशाचेच भान नसते.... नंतर कधीतरी मागे वळून बघताना जाणवते.... हा, आपण तुडवून आलो ती वाट.. जी किती अशक्य, केवढी खडतर होती.... आपण स्वतःला शाबासकी देतो आणि भोगलेल्या दुखऱ्या क्षणांना आठवणीच्या कुपीमध्ये मोत्यागत मढवून टाकतो.... खूप एकटे एकांती असताना तो मोती काढून निरखत राहतो.... यातनेतील सुख उपभोगत राहतो.....
खरेतर जगताना, भोगताना त्या क्षण-नाट्यातले आपण एक पात्र असतो..... काळ सरून गेल्यावर त्याच नाट्याचं स्मरणातलं रेकॉर्डिंग पाहताना आपण एक प्रेक्षक असतो.... या दोन वेगवेगळ्या भुमिका आहेत.... त्यामुळे या दोन्ही वेळी वेगवेगळी अनुभूती असणं क्रमप्राप्त आहे, नाही का..?.. आपण सतत बदलत असतो, घडत असतो याचेच हे लक्षण आहे.... काहीवेळा गेलेला काळ.... पुन्हा संपूर्ण समग्रतेने.... जागृततेने, भोगण्याची उत्कट वासना (इच्छा) आसक्ती होते...कारण मागील दुःख/यातना भोगताना, आपण स्वतःला विसरलेलो होतो..!..
आपलं संस्कारित मन हे दुर्दैवानं आपल्या नकळत नकारात्मक बाबी स्वीकारण्यासाठी तुलनेनं जास्त अनुकूल असतं.... तरीही प्रत्यक्ष भोगताना नकोसे वाटलेले, असह्य क्षण, सहन करून आपण निग्रहाने पुढे आलेलो असतो.... घडलेलो असतो, ज्या घड्ण्यावर ते क्षण सोसण्याचेच संस्कार असतात.... त्यामुळे नंतर मागे वळून पाहणाऱ्या 'आपल्याला' ते क्षण फारसे त्रास तर देतच नाहीत.... उलट अभिमान आणि आत्मविश्वासच देतात..!...  
आता या सर्वाचे मर्म वा सार म्हणजे.... काही क्षण प्रसंग आपल्यालाच घडविण्यासाठी निर्माण केले जातात..... जर आपण त्यातून योग्य ते घेऊन घडलो तर साधले..... यासाठी अप्रत्यक्ष जगणे सोडले कि मग प्रत्यक्षात शक्यतो असह्य असे क्षण येत नाहीत असे वाटते....

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती | व्याघ्र ते न खाती सर्प तया ||
विष ते अमृत आघात ते हित | अकर्तव्य ते नीत होय त्यासी ||
दुख ते देईल सर्व सुखफळ | होतील शीतल अग्नीज्वाळा ||
आवडेल जीवा जीवाचियापरी | सकळ अंतरी एक भाव ||
गुरुकृपा आज केली नारायणे | जाणीजेते येणे अनुभवे ||

ॐ श्री गुरुदेव दत्त.....

No comments:

Post a Comment