Tuesday 27 November 2012

नित्य सत्कर्मे अहंकार दूर.... देहा चित्ती समाधानी सूर..... 

आज गुरुबोध कसा प्राप्त होतो ते सांगतो.... बघा, गुरु आपल्या शिष्यांना कुठल्या प्रकारे ज्ञानार्जन करतील.... हे केवळ गुरुच जाणोत त्याचीच ही एक बोध कथा.... श्रीराम..... 

एकदा गुरु आपल्या शिष्यांना वेगळ्या प्रकारे ज्ञानार्जन करण्याचे योजतात.... याकरिता एक दिवस ते आपल्या सर्व शिष्यांना सकाळी आपल्या नित्य बैठकीच्या खोलीत येण्यास सांगतात.... सारे शिष्य जमा होउन खोलीच्या एका कोपऱ्यात उभे राहतात.... आणि निरीक्षण करु लागतात.... पण ते पाहतात तर काय..?.. श्रीराम.... 

गुरुंनी त्यांना बोलावलेले असते..... पण ते शिष्यांशी एकही शब्द बोलत नाहीत.... आपल्या नित्यकर्मात व्यस्त असतात.... ते आपली बैठकीची खोली एका कापडाने स्वच्छ पुसुन घेतात.... जरा वेळ थांबतात आणि त्यावर गालिचा पसरतात.... बस्स इतकेच! हे झाल्यावर शिष्यांना परत पाठवतात..... श्रीराम..... 

शिष्यांना याचा काहीच उलगडा होत नाही..... शिष्यांची गोंधळलेली अवस्था बघुन... गुरु त्यांना झाल्या प्रकाराचा उलगडा करुन सांगतात.... ते म्हणतात, "निरीक्षण शक्ती हे माणसाला लाभलेले फार मोठे वरदान आहे, ते आत्मसात केले तर अनेक गोष्टींचा उलगडा सहज होतो.".... बैठकीची खोली पुसताना एक कपडा हातात घेउन एका टोकापासुन सुरवात करुन मागे मागे सरकत दुसऱ्या टोकापर्यन्त संपुर्ण खोली पुसुन काढली न की खोली पुसताना पुढे गेलो..... मागे येण्याची दिशा कायम ठेवली..... श्रीराम..... 

याचा अर्थ असा की माणसाच्या मनावरही दररोज क्रोध मोह इ. कुकर्माचा कचरा साचत असतो.... नित्यकर्माच्या कपड्याने ही असेच मागे येत..... म्हणजे अहंकार क्षीण करत चित्त शुद्ध करावयाचे असते.... जर अंहकार वाढला.... म्हणजेच जमीन पुसताना पुढे गेलो आणि मागे वळुन पाहिले... तर आपल्याच पायच्या ठश्याने जमीन मलिन दिसते व कार्य सफल होत नाही..... पण जमीन स्वच्छ करताना मध्ये मागे गेल्यास... म्हणजेच अहंकार क्षीण केल्यास मागे बघितल्यास किती मलिनता शिल्लक आहे हे कळते व पुढे पाहिल्यास किती स्वच्छ केले हे कळुन येते.... श्रीराम..... 

नंतर जमीन पुसुन झाल्यावर क्षणभर ती वाळेपर्यन्त थांबलो..... तद्वतच मनाला या कार्यानंतर थोड्या विश्रांतीची गरज असते..... त्यानंतर गालिच्याची गुंडाळी घेतली व दुसऱ्या टोकापासुन पहिल्या टोकापर्यन्त पुढे पुढे उलगडत गेलो.... न की पहिल्या टोकापासुन मागे उलगडली.... याचा अर्थ असा की सत्कर्म करताना पुढे पुढे जायचे असते..... जर ते करताना मागे हटलात... तर तोंडघशी पडण्याचा संभव येतो..... गालिचा संपुर्ण उलगडताना मध्येच मागे वळुन पाहिले तरी उलगडलेला गालिचाच दिसतो.... अन्‌ पुढे पाहिल्यास किती कार्य बाकी आहे याचे ज्ञान होते..... अशाप्रकारे आपल्या शिष्यांना ते खोली पुसुन त्यावर गालिचा का पसरवला या मागचे कारण समजावुन सांगितले..... श्रीराम..... 

बघा, यामागचे तात्पर्य हेच कि आपण नित्यकर्माच्या कपड्याने नेहमी अंतर्मनातील कुकर्मांना स्वच्छ करुन मागे हटुन आपला अंहकार क्षीण करावा.... आणि सत्कर्म करताना मागे न हटता केवळ पुढेच जात यश कीर्ती दुर्लक्षून त्याकडे न पाहता समाधान आनंदाचा गालिचा दुरवर पसरवावा..... श्रीराम..... 

सत्कर्म करताना त्याच्यामागे भाव शुद्ध असावा लागतो..... कर्मामागचा भाव जर शुद्ध नसेल, तर ते कर्म शुद्ध न रहाता अशुद्ध कर्म होईल..... शुद्धभावाने केलेल्या कर्माला यश मिळते..... सतत शुभ विचार करणे हे हि सत्कर्म आहे..... आपली प्रत्येक कृती एक तात्पर्य जपते..... आपल्या सभोवती घडणारी प्रत्येक कृती आपल्याला सुसंस्कारित करण्यासाठीच असते.... फक्त डोळ्यांनीच नव्हे तर.... विवेक व विचारांच्या चक्षुंनी आपण संस्कारांच सार आत्मसात करून कृतीत आणलं पाहिजे..... तीच आपल्या सदगुरूंनी दिलीली शिदोरी.... कधीही न संपणारी..... श्रीराम.... 

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment