Friday 6 April 2012

बोध कथा.... 

हनुमंतासारखे चतुरस्र व्हावे..... व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास साधावा......

"ते माझे काम नव्हे' असे कोणत्याही प्रकारच्या कामाबद्दल म्हणू नये...... प्रत्येक माणसाने चारही वर्णांच्या गुणांचा अंगीकार करावा...... बुद्धिजीवी माणसाने थोडेसे बळ मिळवावे..... व्यवहारही शिकावा.....कला – कारागिरी - श्रम यांचाही अंगीकार करावा..... हनुमंतासारखे चतुरस्र व्हावे..... व्यक्तिमत्त्वाचा असा चौफेर विकास साधावा.... तरच सध्याच्या स्पर्धात्मक.... धकाधकीच्या वातावरणात तग धरता येईल....

रामदासांनी म्हटल्याप्रमाणे "दास म्हणे ऐसे करा । सदा मारुती हृदयी धरा...' मारुतीसारख्या बहुआयामी व्यक्तित्वाची कास धरावी, हाच उपाय आहे..... मनाच्या वेगाने आणि वाऱ्याच्या चपळाईने धावणारे लवचिक शरीर धारण करणाऱ्या ..... महाबली मारुतरायाची जयंती तालमी आणि व्यायामशाळांमध्ये आपण साजरी करतो..... ते योग्यच आहे..... पण या स्थळांच्या बरोबरीने संशोधन संस्थांमध्ये.... वेदपाठशाळांमध्ये.... योगवर्गांत आणि वक्तृत्ववर्गांमध्येही हनुमानजयंती साजरी होणे अगदी उचित आहे.... एवढेच नव्हे....... तर संगीतवर्गांमध्येही या " संगीतज्ञान महंताची " जयंती साजरी होणे समर्पक ठरेल....

हनुमानाचे व्यक्तिमत्त्व केवळ बलोपासनेपुरते मर्यादित वा एकारलेले नाही...... हनुमान उत्कृष्ट राजनीतिज्ञ, दूत, तत्त्वज्ञ आणि योगी असल्याचे उल्लेख रामायण- महाभारतापासून लोकवाङ्‌मयापर्यंत मिळतात...... एकीकडे महाबळी.... प्राणदाता आणि दुसरीकडे " बुद्धिमतां वरिष्ठम्‌ " असे दोन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचे अद्‌भुत रसायन म्हणजे वायुपुत्र हनुमान.......

हनुमंताला " भीमरूपी महारुद्रा " म्हणून रुद्रावतारात त्याची गणना केली आहे..... उत्कृष्ट योद्धा म्हणून राम-रावणयुद्धात त्याने रावणपुत्र अक्ष... जम्बुमाली.... धूम्राक्ष... निकुंभ यांसारखे महायोद्धे मारले..... सूर्यदेवतेने या बालहनुमंताला सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता दिली..... शास्त्र आणि वेदार्थनिर्णय याविषयी त्याची बरोबरी करणारे दुसरे कुणी नाही.... असा रामायणाच्या उत्तरकांडाचा निर्वाळा आहे.....

नूनं व्याकरणं कृत्स्नम्‌ अनेन बहुधा श्रुतम्‌ ।
बहु व्याहरतानेन न किंचिदपशब्दितम्‌ ।।'

असे वाल्मीकींनी सांगितले आहे..... कितीही बोलला तरी त्याच्या मुखातून एकही अशुद्ध शब्द किंवा अपशब्द येत नाही..... म्हणजे त्याने व्याकरणाचा समग्र अभ्यास केलेला आहे..... अशी "संस्कारक्रम संपन्नता' म्हणजे शुद्ध आणि स्पष्ट वाणी उच्चारणारा हनुमान.... सत्य बोलणारा आणि मनाला प्रसन्न वाटेल असे मृदू बोलणारा होता.....

पण आता प्रश्न असा आहे.... की असा विकास शक्य व आवश्य्क आहे.... हे आधी मनाला पटले पाहिजे....

खरा प्रश्न इथेच आहे..... हे शक्य होण्यासाठी काय करता येईल.... याची एक छोटीशी यादी इथे देता येईल.....

प्रथम म्हणजे विविध क्षमतांची गरज आहे, हे आपण मनापासून मानले पाहिजे.....

दुसरे म्हणजे, या क्षमता अंगीकारता येतील... असा विश्वा स बाळगला पाहिजे.... यात काही अंतर्विरोध नाही.... त्या परस्परपूरक क्षमता आहेत, हे ओळखले पाहिजे.....

तिसरे म्हणजे, अशा परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे आदर्श आपल्यापुढे ठेवले पाहिजेत..... हनुमान ही त्यासाठीची देवता..... आजही आपल्या अवतीभवतीचे असे अनुकरणीय आदर्श आपण शोधून काढू शकतो.....

चौथी गोष्ट म्हणजे, लोकांच्या उपहासाला भीक न घालता आपण या दिशेने आपले प्रयत्न आणि प्रयोग सुरू केले पाहिजेत...

हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण असा संकल्प जरूर करू या.......

जय हनुमान ..... जय श्रीराम ......   ॐ श्री गुरुदेव दत्त .......



सत्कर्म - दुष्कर्म.... 

एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता... त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही... शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला... हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला... तो भीतीने पळायला लागला...

वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली... पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली... वर अस्वल, खाली वाघ.!. आता काय करायचं.?. तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको... वर ये... मी तुला काही करणार नाही... मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय..."

माणूस मग वर गेला... वाघ मात्र झाडाखाली बसून होता... रात्र झाली तशी माणसाला झोप लागली... हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस... त्याला खाली ढकलून दे... माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही..." पण अस्वलानं तसं केलं नाही...

थोड्या वेळानं माणसाला जाग आली... मग अस्वलानं जरा डोळे मिटले... वाघानं ही संधी साधली... तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल... माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल..."

माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला... सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते... त्यामुळे ते पडलं नाही...  पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला...

ते म्हणालं, "मी तुझ्याशी दगा केला नाही... परंतु तू मात्र मला फसवलंस... "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं..."

बोध - पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे... ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो... सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही... ॐ श्री गुरुदेव दत्त .....






आयुष्याची पारख... 

एक सोनार होता... त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते... सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे, पण जेंव्हा लोहार काम करत असे, तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत
असल्याने मोठा आवाज होत असे...

तो आवाज मोठा कर्णकर्कश असे... एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला... त्या सोन्याच्या कणाची भेट, एका लोखंडाच्या कणाशी झाली... खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले...

सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले, "दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे... दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते... मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे... दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे...

पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही. पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो...

बोध - दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो... आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा... कारण... पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या... ॐ श्री गुरुदेव दत्त .....





कागद आपल्या नशिबाने उडत असतो... पण पतंग आपल्या कौशल्यावर उडतो... म्हणूनच लक्षात ठेवा नशीब नसेल तरी चालेल पण आपणाकडे कौशल्य हे हवेच.... ॐ श्री गुरुदेव दत्त .....



No comments:

Post a Comment