Friday 6 April 2012

ध्येय मिळेपर्यंत एक क्षणभरही थांबू नको….. एक चिंतन

ज्या वेळेस वाईट दिवस आलेले असतील…… ज्या वेळेस दुर्दशा झालेली असेल, त्या वेळेस स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या आवडीनावडी, सर्व काही बाजूस सारून प्रत्येकाने पडेल ते काम करावयास पुढे आले पाहिजे…… आशय असा की....  सुख, संपत्ती, सन्मान या वस्तू मिळविण्याच्या मागे लोकांनी लागू नये….. अमूर्त असे जे ध्येय त्याची जीवेभावे करून सेवा करावयाची…… 

अमूर्त असे जे ध्येय..... त्याची सेवा करायची म्हणजे कमीपणा पत्करायचा, कष्ट पत्करायचे....  त्याची सेवा करावयाची म्हणजे भोग सोडायचा..... सुख सोडायचे व भावना मारायच्या ......  आणि इतके करूनही कदाचित् अपयशही यावयाचे…... ध्येयासाठी अशी ही किंमत द्यावी लागते…… 

या ध्येंयाकडे जाण्याने माझे व इतर सर्वांचे अपरिमित कल्याण होणार आहे…… हाच एक विचार ध्येयाला पुजणार्‍या माणसाचे मन पोलादी बनवीत असतो……. म्हणून हृदयात महनीय आकांक्षा धरा..... क्षुद्र भूक न धरता मोठी भूक बाळग...... क्षुद्र वस्तूकडे हृदय जाताच कामा नये…… दृष्टी वळताच कामा नये…… कमळ चिखलात असो वा सुंदर सरोवरात असो, त्याची दृष्टीवर सूर्याकडे असावयाची……

आपणास हा प्रकाश कसा मिळणार ? परमोच्च सत्याकडे कष्टाने सतत चढत जाण्यानेच दिव्य दृष्टी मिळते… सतत श्रम करूनच दुसर्‍याच्या उपयोगी आपण पडू शकू..... ही गोष्ट आपण सदैव ध्यानात धरली पाहिजे…… ज्या ज्या मार्गात आपण घुसू...... तेथे शक्य तितके पुढे आपण गेले पाहिजे…... त्या त्या कर्मक्षेत्रात परमोच्च तत्त्वाचे दर्शन करून घेतले पाहिजे…… रात्रंदिवस काम काम..... काम करूनच स्वत:चा व स्वत:च्या बंधूंचा उध्दार करण्याची पात्रता आपल्या अंगात येईल…… काम करीत गेल्यानेच अधिकाधिक शक्ती व उत्तरोत्तर अनुभवपूत निर्मळ दृष्टी प्राप्त होत जातील…….आपण आज ईश्वराचे काम करू...... आपल्या मागून येणार्‍या पिढीला प्रकाश, आनंद व वैभव लाभेल…….

अंत:करणात क्षुधा वाढू लागली तरी प्रथमच मिळालेल्या लहानशा फळाला खाऊन समाधान घेऊ नका…… भूक लागली तरी उतावीळ होऊ नका…… उतावीळपणाने केलेले काम, अविचाराने केलेले काम पतनास व नाशास कारणीभूत होतो…... लोककल्याणासाठी एवढे प्रयत्न करीत असूनही अद्याप फळ कसे मिळत नाही.... असे मनात आणून जळफळणारे, बोटे मोडणारे, अधीर लोक नेहमी दिसतात….. 

परंतु अशी अधीरता म्हणजे खरी भूतदया नव्हे….. रोगी लवकर बरा होत नाही म्हणून रोग्यावर जळफळणारा हा खरा सेवक नव्हे……  मुलाची किती सेवाशुश्रूषा करू, असे म्हणून माता कंटाळणार नाही…… खर्‍या प्रेमाला व खर्‍या सेवेला कंटाळा माहीतच नसतो…….. 

ताबडतोब फळ मिळविण्याची इच्छा करणार्‍याचा प्रयत्न हा क्षणिक असतो…… तो तामस प्रयत्न होय…... अखंड सेवा, अखंड धारणा...... अनुभवाने हळूहळू पूर्ण होत जाणारी प्रज्ञा ह्या गोष्टी पदरी असल्याशिवाय.... मी इतके घाव घातले... मी इतकी सेवा केली.... असे मोजण्याचा अधिकार नाही……  बुध्दी जवळ असल्याशिवाय शुध्द सेवा करता येत नाही…… आणि ही बुध्दी अनुभवानेच मिळत असते……  आणि अनुभव म्हणजे प्रत्यक्ष सेवा….. सेवा व ज्ञान ही परस्परावलंबी आहेत…… 

मागे फार लांबचा आहे….. पल्ला पुष्कळ गाठावयाचा आहे…… तरवारीच्या धारेवरून चालत जावयाचे आहे…... कधी कधी पुढचे पाऊल टाकावयासही तेथे नीट दिसत नाही….. संत ऋषिमुनी- त्या मार्गाने जे गेले ते असे सांगत आहेत…… - “तरीही निराश नको होऊ...... जागा हो व ऊठ...... धडपड करीत पुढे चल…… ध्येय मिळेपर्यंत एक क्षणभरही थांबू नको……..

ॐ श्री गुरुदेव दत्त ………..

No comments:

Post a Comment